निकालानंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

    04-Jun-2024
Total Views |
 
Fadanvis
 
मुंबई : पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सलग तिसर्‍यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे. आज लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून एनडीएला २९४ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत देशभरातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.
 
 
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "इंडी आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, तर ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळाले," असे म्हणत त्यांनी या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
 
हे वाचलंत का? -  ठाकरेंना दणका! नारायण राणेंच्या रुपात कोकणात कमळ फुलले
 
"उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या. पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले असते, तर भाजपा स्वबळावर ३१० च्या पुढे गेली असती. देशातील जनतेने भक्कमपणे मोदीजींना साथ दिली आहे. संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव आहे. पण, तरी निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो. तो शिरसावंद्य मानायचा असतो. या निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.