मुंबई : विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उबाठा गटाने पैशाचा धुमाकूळ घातला, असा गौप्यस्फोट मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. गुरुवार, २७ जून रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आशिष शेलार म्हणाले की, "काल झालेल्या विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं. याठिकाणी उबाठा सेनेने पैशाचा धुमाकूळ मांडला होता. उबाठा गटाचे उमेदवार 'अभ्यंकर हे भयंकर' आणि 'परब हे अरब' असल्यासारखे त्यांचे लोक पैसे वाटप करत होते. त्यामुळे पैशाच्या जीवावर मतदारांना विकत घेता येतं, असा धुमाकूळ त्यांनी घातला," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - ठाणे, मीरा-भाईंदरमधील अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवा!
ते पुढे म्हणाले की, कोणतेही व्यावसायिक बांधकाम न करता मुंबईकरांसाठी ३०० एकर मोकळ्या जागेची निर्मिती आणि सुशोभीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे सर्व मुंबईकरांतर्फे आभार मानले.
यासोबतच तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या मोकळ्या जागा कोणत्याही व्यावसायिक कामासाठी वापरणार नाही, याची लेखी हमी का दिली नाही? काही बिल्डरांना त्या जागा देण्याचा घाट होता का? याची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री शिंदेंकडे केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.