शाहू महाराजांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग - कथा

    22-Jun-2024
Total Views | 1895
Life of Shahu Maharaj


शाहू महाराज हे एक वादळी व्यक्तिमत्त्व होते. एकाच वेळी त्यांनी सामाजिक क्रांती आणि धार्मिक क्रांती या दोन्ही पातळ्यांवर जीवनभर लढा दिला.कोल्हापूर परिसरात आजही शाहू महाराजांच्या जीवनातील कथा, प्रसंग सांगितले जातात. महाराज एकीकडे राजर्षी असले तरी काकणभर अधिक ते लोकराजा होते, हे या कथांमधून आपल्याला दिसून येते. काही निवडक कथा आपण येथे वाचूया

महाराज त्याला शिवू नगा

त्र्यम्बोलीदेवी हे कोल्हापूरकरांचे अंबाबाईइतकेच महत्त्वाचे श्रद्धास्थान. या देवीच्या यात्रेत, उत्सवात छत्रपती घराण्याचा खासा मान असतो.ही देवी वसली आहे त्या टेकडीला टेंबलाईची टेकडी असे म्हटले जाते. राजघराण्यांतील व्यक्तीच्या उपस्थितीत दरवर्षी येथे कुष्मांड पंचमी साजरी केली जाते. असे हे महत्त्वाचे देवस्थान! एका श्रावणात शुक्रवारी शाहू महाराज आपल्या घोडागाडीतून काही सेवकांना घेऊन टेंबलाईच्या टेकडीवर देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. महाराज निघाल्याचे समजले की रस्त्यावर लोक आपल्या राजाला मुजरा करण्यासाठी येत असत. पहाटेची वेळ होती, रस्त्यावर लोक जमा झाले होते. महाराजांची घोडागाडी पायथ्याशी आली, एकदम थांबली! महाराज बघतात तो काय समोरून एक उधळलेली बैलगाडी तुफान वेगाने खाली येत होती. बैल वार्‍याच्या वेगाने धावत होते आणि गाडीवानाला आवरत नव्हत तितक्यात एक लहान मुलगा काय सुरू आहे हे बघण्यासाठी पुढे सरसावला आणि त्याचवेळी बैलगाडी अगदी जवळ येऊ घातली. ते दृश्य बघताच महाराजांनी क्षणार्धात घोडागाडीतून उडी टाकली आणि त्या लेकराला त्यांनी उचलले! त्याच क्षणी कुणीतरी ओरडले, “महाराज त्याला शिवू नगासा. त्यो म्हाराचा पोरगा हाये.” महाराजांनी ते शब्द न ऐकल्यासारखे करून आधी त्या मुलाला गाडीसमोरून वाचवले.पायथ्याशी आलेली गाडी कशीबशी एका झाडावर आदळून थांबली.
 
समोर प्रत्यक्ष महाराज, त्यांच्या पोटाशी थोडक्यात वाचलेला तो पोरगा हे पाहून गाडीवान भ्यायला आणि त्याने महाराजांच्या पायांवर लोळण घेतली. महाराजांनी त्याची पाठ थोपटून त्याला अभय दिले. नंतर समोरच्या गर्दीकडे बघत महाराज म्हणाले, “कोण सांगत होतं, या पोराला शिवू नका म्हणून?” सगळे गप्प उभे राहिले. महाराज म्हणाले, अरे समोर यमदूत येत असताना लेकराला वाचवायचे की त्याची जात बघायची? माणसं आहात की सैतान? या जागी तुमचं मूल पण असू शकलं असतं. जीव महत्त्वाचा की जात? नंतर, महाराजांनी त्या मुलाला आपल्यासोबत गाडीत घेतले. त्याच्यासोबतच्या लोकांना सांगितले की, तुम्ही टेकडीवर या, आज तुमचा पोरगा आमच्यासोबत देवीचे दर्शन घेणार! त्याचं आयुष्य वाढलं, त्यासाठी देवीच्या पायांवर घालतो त्याला. असे होते महाराज!

बळीराजा महत्त्वाचा, तोफा नव्हेत!

१९१० च्या सुमारास सांगली जिल्ह्यात लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्करवाडी वसवली. शाहू महाराजांचा किर्लोस्करांवर विशेष लोभ होता. पहिल्या महायुद्धानंतर कारखाना बंद पडतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण लोखंड, पक्के रंग आदी कच्चापक्का माल इंग्लंडहून घेणे बंधनकारक होते आणि युद्धानंतर आयात-निर्यात मंदावली. कच्च्या मालाची चणचण वाटू लागली. यावर उपाय शोधताना शंकरराव किर्लोस्करांना एक कल्पना सुचली. ती त्यांनी आपले स्नेही, टेक्निकल स्कूलचे सुपरिटेंडंट काटे यांना सांगितली. बापूसाहेब महाराज कागलकर यांच्याकडे दोघेजण गेले, त्यांनाही कल्पना पटली आणि त्यांनी शाहू छत्रपतींकडे येण्याचे कबूल केले. तिघेजण शाहू महाराजांसमोर उभे राहिले. शंकरराव किर्लोस्करांनी कारखाना बंद पडत आला आहे, नांगराअभावी शेतीची कामे खोळंबणार आहे. धान्यतुटवडा, कच्च्या मालाची अडचण असे सगळे सांगितले.

मग यात आमची काय मदत हवी आहे, असे शाहूंनी विचारले.त्यावर सगळा धीर गोळा करून कागलकर महाराज म्हणाले, ”र संस्थानातील किल्ल्यांवर खूप लोखंडी तोफा, चिलखते आदी साठलेले आहे. ते जर नांगर तयार करण्यासाठी मिळाले तर मजूर आणि शेतकरी दोघेही तगतील” महाराजांनी काही क्षण विचार केला आणि ते म्हणाले, मजूर आणि शेतकर्‍यांना महायुद्धाच्या काळात आपणच जगवले पाहिजे. नमुन्याच्या काही तोफा प्रत्येक जागी ठेवून बाकीच्या नांगरांसाठी अवश्य घ्या. त्याची संस्थानाला दमडीही नको. फक्त नांगर स्वस्त द्या आणि मजुरांना सतत काम मिळत राहील असे पाहा! संस्थानाचा अभिमान, स्वाभिमान, पुरातन काळापासूनच्या वस्तू असलं काहीही मनात न आणता लोकराजाने लोकांना उदारपणे तोफा दिल्या. तोफांचे नांगर हे युद्धाकडून बुद्धाकडे जाणेच जणू होते!
 
 
गीतारहस्याचे ’रहस्य’..

छत्रपती शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांचे परस्परविरोधात खटले सुरू होते. त्यांच्यातील वैचारिक मतभेद सगळ्यांना माहीत होते. याच काळात १९१४ साली, मंडाले तुरुंगातून परत आलेल्या टिळकांची भेट घ्यायला शाहू महाराज गायकवाडवाड्यात आले. टिळक छत्रपतींना म्हणाले, “माझे एक काम तुम्ही करावे, अशी विनंती आहे. मी मंडालेच्या तुरुंगात असताना भगवद्गीतेवर काही लेखन केले आहे. छापण्यापूर्वी मुंबई सरकारला त्याचे मूळ हस्तलिखित पाहायचे आहे. ते आपण स्वहस्ते न्यावे व मला परत आणून द्यावे। छत्रपतींनी सुहास्यवदनाने लोकमान्यांची विनंती मान्य केली. गायकवाडवाड्यातील सोबतचे लोक अस्वस्थ झाले. चाचरत एकजण लोकमान्यांना विचारता झाला. ते हस्तलिखित सुरक्षित राहील का? त्यांचा आणि आपला कोर्टात खटला सुरू आहे ना?त्यावर टिळकांनी मोठ्या विश्वासाने सांगितले, काळजी करू नये। छत्रपती आणि माझ्यात व्यावहारिक वाद आहेत खरे, पण माझा गीतारहस्याबाबत स्वतःइतकाच त्यांच्यावर विश्वास आहे. त्या हस्तलिखिताचे मोल ते जाणतात!
 
काही दिवसांतच महाराजांनी मुंबई सरकारकडे हस्तलिखित दिले. सरकारने ते तपासून शाहू छत्रपतींकडे परत केले आणि शाहूंनी ते टिळकांपर्यंत पोहोचवले. आजारपणाच्या काळात टिळकांच्या पुत्राला आमच्याकडे त्यांची विश्रांतीची व्यवस्था करतो, हवापालट करण्यासाठी येथे घेऊन यावे, असेही कळवले होते. असे उमद्या मनाचे होते शाहू छत्रपती  आली माझ्या घरी ही दिवाळी दिवाळीचे दिवस होते. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. घरोघरी फराळाच्या पदार्थांचे सुगंध येत होते. महाराज नेहमीप्रमाणे गाडीतून देवदर्शन आदी करून परतत होते. उतरताना त्यांनी पाहिले की एक लहान मुलगा झाडाआड दडून त्यांना पाहत आहे. त्याचे कपडे जुने होते आणि चेहर्‍यावर हसू नव्हते. हे महाराजांनी टिपले. त्यांनी चालकाला त्या मुलाला घेऊन येण्यास फर्मावले व स्वतः राजवाड्यात गेले. चालकाने त्या घाबरलेल्या मुलाला हाताला धरून आणले होते, त्याच्यामागे वाड्यावरील एक रखवालदार खाली मान घालून उभा होता. चालकाला जावयास सांगून महाराजांनी मुलाच्या हातातील पिशवी घेतली आणि विचारले, “काय रे मला बघून लपत का होता? काय आहे पिशवीत?”

त्यावर तो रखवालदार पुढे सरसावला, मुजरा केला आणि म्हणाला, “माफी करावी महाराज, घरधनीनीने जेवायचा डबा पाठवलाय, लेकराला दरबाराचे काही माहिती नाही, म्हणून घाबरून लपला होता.” महाराजांनी सगळे जाणून घेतले. डबा उघडून पाहिला. जोंधळ्याच्या जाड भाकरी, ठेचा आणि झुणका ते पाहून महाराजांचे डोळे पाणावले! दिवाळीच्या दिवशी वाड्यावरील सेवकाच्या घरची ही स्थिती! त्यांनी लगेचच वाड्यावरील सेविकेला आज्ञा केली, या लेकराला न्हाऊमाखू घालून नवे कपडे व फराळाचे द्या झाला प्रकार राणीसाहेबांना समजला. त्यांनी त्या रखवालदाराच्या घरी साडीचोळी आणि गोडाधोडाचा फराळ तर पाठवलाच, पण काम करणार्‍या प्रत्येक सेवेकर्‍याच्या घरीही फराळ पोहोचेल, असे जातीने पाहिले. त्यावर्षीपासून राजवाड्यातून फराळ व दिवाळीचे साहित्य देण्याचा प्रघातच पडला!

डॉ. रमा दत्तात्रय गर्गे


अग्रलेख
जरुर वाचा
जागतिक दर्जाचे कुस्तीपटू सुधीर पुंडेकर अंत्योदय पुरस्काराने सन्मानित!

जागतिक दर्जाचे कुस्तीपटू सुधीर पुंडेकर अंत्योदय पुरस्काराने सन्मानित!

आज भारत क्रीडा क्षेत्रात आपला ठसा सर्वत्र उमटवित आहे. दुर्लक्षित खेळांचाही यात समावेश आहे. पूर्वी खेळाडूंना प्रतिकूल परिस्थितीशी झगडून वर यावे लागे. साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील जागतिक दर्जाचे कुस्तीपटू श्री. सुधीर पुंडेकर हे असाच संघर्ष करून पुढे आले. डी. एच. गोखले व श्यामला गोखले धर्मादाय न्यास पुरस्कृत आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित अंत्योदय पुरस्कार - २०२५ श्री. पुंडेकर यांना आज प्रदान करण्यात आला. श्री. पुंडेकर जगात पहिल्या पाच कुस्तीविरांमध्ये गणले जातात. ठाणे जिल्ह्यातील भाईंदरमध्ये झालेल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121