मुंबई : वरळीत राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिल्याने त्यांचा मुलगा आमदार झाला. तेव्हा त्यांना काहीही वाटलं नाही, असा पलटवार मनसे नेते अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी महायूतीला दिलेल्या पाठिंब्यावर टीका केली होती. काही जणांनी 'बिनशर्ट' पाठिंबा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर आता अमित ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले.
अमित ठाकरे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंचा विनोद त्यांना समजवायला आणि मला कळायलासुद्धा दहा मिनिटं लागलीत. वरळीत आम्ही त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता, तेव्हा त्यांना काही वाटलं नाही. तेव्हा त्यांनी तो घेतला आणि मुलाला आमदार बनवलं. त्यामुळे या गोष्टी आपण विसरायला नको. राज ठाकरे साहेबांनी स्वत:च्या मेहनतीने पक्ष काढला आहे," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - जामीन आणि सुटका यात जमीन आसमानचा फरक! राऊतांनी समजून घ्यावा
विधानसभा निवडणूकांच्या तयारीकरिता अमित ठाकरे विधानसभा मतदारसंघांचा दौरा करत आहेत. यातच आज त्यांनी वरळी मतदारसंघाचा दौरा केला. विधानसभेची तयारी सुरु झाली आहे. त्यासाठी वरळीपासून बैठकही सुरु झाली आहे. सगळ्या विधानसभांमध्ये मी फिरणार असून लोकांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी आदित्य ठाकरेंबाबत बोलताना ते म्हणाले की, "एका आमदाराला पाच वर्षांचा कार्यकाळ मिळतो. पण निवडणूकीच्या शेवटच्या तीन महिन्यांत काम करुन काही फरक पडेल असं मला वाटत नाही. कोविड काळापासून कोळीवाडा, वरळीकडे त्यांनी ज्याप्रकारे फिरायला हवं होतं ते दिसलं नाही. त्यामुळे या अपेक्षेने आम्ही त्यांनी बिनशर्त पाठिंबा नव्हता दिला," असेही ते म्हणाले.