मुंबई : शहरातील वाढत्या रोहिंग्या आणि बांग्लादेशी लोकांच्या अनधिकृत वास्तव्यामुळे फक्त पोलिसांची नाही, तर आपल्या समाजाची देखील डोकेदुखी वाढली आहे, असे कॅबिनेट मंत्री तथा उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. वाढती गुन्हेगारी, अमलीपदार्थांचा व्यापार इतकेच नाही तर त्यांनी यावेळी मतदान देखील केल्याचे मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, लोढा यांनी निवडणूक आयोगाला विनंती करताना म्हणाले, राज्यातील मतदार यादीची पुन्हा तपासणी करून त्यामधील रोहिंग्या व बांग्लादेशी नागरिकांची नावे काढून टाकावी. तसेच, एटीएसकडून अतिशय चांगल्या रीतीने धरपकड केली जात असून त्यांना परत पाठवत आहे, असेही लोढा म्हणाले. मुंबई उपनगरात एक विशेष टीम सुद्धा गठीत केलेली असून जोपर्यंत रोहिंग्या बांग्लादेशींना परत पाठवणार नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका लोढांनी स्पष्ट केली आहे.
अनधिकृतरित्या कागदपत्रे बनवून भारतीय नागरिकांच्या हक्काच्या सुविधा घुसखोरांना मिळत असल्याने आज कठोर कायद्याची गरज व्यक्त करतानाच केंद्रीय गृहमंत्री व राज्याचे गृहमंत्री याबाबतीत सजग असून त्यावर योग्य कार्यवाही होईल, असा विश्वास व्यक्त केले. दरम्यान, भाजपकडून वसंत स्मृती येथे आयोजित केलेल्या प्रादेशिक बैठकीनंतर मंत्री लोढा यांनी माध्यमांशी संवाद साधला.