मविआत वादाची ठिणगी? उद्धव ठाकरेंनी टाळला पटोलेंचा फोन

    11-Jun-2024
Total Views |
 
Thackeray & Patole
 
मुंबई : मित्रपक्षांच्या नेत्यांचे फोन न घेणे, त्यांना ताटकळत ठेवणे, असे प्रकार उद्धव ठाकरेंनी अद्यापही बंद केलेले नाहीत. महाविकास आघाडीतील नेत्यांनाही त्यांनी अशीच वागणूक देण्यास सुरुवात केली असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्याविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
 
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी सर्व जागांवर परस्पर उमेदवार जाहीर केले. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ठाकरेंनी आघाडीधर्म पाळून नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवार मागे घ्यावेत, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. मात्र, त्याबाबत कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने काँग्रेस नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
 
हे वाचलंत का? -  "८ जागा मिळाल्याने पवारांना हत्तीचे बळ!"
 
याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, "ज्यावेळी उद्धव ठाकरे लंडनमध्ये गेले, तेव्हा फोनवरून संवाद झाला. विधानपरिषदेच्या दोन जागा तुम्ही लढा आणि दोन जागा आम्ही लढतो असे मी त्यांनी सांगितले. त्यांनी मला तुमचे उमेदवार कोण? असे विचारले. त्यावर मी उमेदवारांची नावे सांगितली. नाशिकमधल्या काँग्रेस उमेदवाराला ठाकरेंनी बोलावून घेतले आणि स्वपक्षातून उमेदवारी जाहीर केली. महाविकास आघाडीत चर्चा करून निर्णय घेतला असता, तर या चारही जागा जिंकणे सोपे झाले असते. ठाकरेंनी चारही जागा घोषित केल्यानंतर मी वारंवार त्यांना फोन लावला. पण त्यांचे ऑपरेटर 'साहेब तयार होत आहेत', असा निरोप देत होते. शेवटी त्यांच्याशी फोनवर संपर्क झालाच नाही. त्यांच्या मनात नेमके काय आहे, हे प्रत्यक्ष भेटल्यावर कळेल," असेही पटोले म्हणाले.