मध्य प्रदेशमधील धारच्या भोजशाळेत भारतीय पुरातत्व विभागाकडून गेल्या ८० दिवसांहून अधिक काळ सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणात दिवसेंदिवस नवनवीन मूर्ती, कलाकृती उत्खननादरम्यान सापडल्या आहेत. त्यानिमित्ताने भोजशाळेचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणारा हा लेख...
भोजशाळा येथील सरस्वती मंदिर प्राचीन काळापासून, अगदी ११व्या शतकात आपल्या देशात फार अभिमानाने मिरवत होते. तसेच ते तत्कालीन जगात ‘ज्ञानभंडार’ म्हणूनही फार प्रसिद्ध होते. पण, म्हणतात ना ‘दैव देते आणि कर्म नेते’, या न्यायाने राज्यकारभारात या मंदिराच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष झाले व मुस्लीम बंडखोरांनी भोजशाळेच्या स्थळावर हल्ले चढविले व ते स्थळ त्यांनी ताब्यात घेतले. एवढेच नाही, तर त्या जागी त्या मुस्लीम बंडखोरांनी भोजशाळेचे खांब आणि त्या वास्तूचे बांधकाम साहित्य वापरले व तेच वापरून मोठी मशीद, मजार व मदरसे बांधले. त्यावेळी बांधलेल्या हिंदू व जैन मंदिरांचा बेमालूमपणे विद्ध्वंस केला. त्यातून अनेक वर्षे हिंदू व मुस्लीम जमातींमध्ये मोठे वादविवाद सुरू राहिले. अयोध्या, काशी व मथुरेच्या महत्त्वाच्या हिंदू मंदिरांवर तेथे अवाढव्य मशिदी वसवल्या गेल्या. म्हणून त्याठिकाणी हल्ली सर्वोच्चन्यायालयाने हिंदूंना त्या जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी परवानगी दिली आहे आणि त्याप्रमाणे तिथे सर्वेक्षणे पार पडत आहेत. त्याच धर्तीवर भोजशाळेचे ‘आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’कडून वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचीसुद्धा न्यायालयीन परवानगी मिळाली आहे.
न्यायालयाने त्या संस्थेला, राज्य सरकारला व केंद्र सरकारला त्यासंबंधी आदेशही दिले आहेत. पण, हा आदेश तेथील एका वर्गाला रुचला नाही. त्यांनी न्यायालयाकडे यासंबंधी स्पष्ट खुलासा मागविला. परंतु, या भोजशाळेच्या विषयाला मात्र या भांडणात काहीच फायदा झाला नव्हता. हे भोजशाळेचे सरस्वती मंदिर खरे म्हणजे राष्ट्रीयदृष्ट्या अतिमहत्त्वाचे झाले आहे व त्याकरिता ‘सर्व्हे ऑफ इंडिया’ (एसआय) या संस्थेच्या श्रमांचे कौतुक केले पाहिजे व त्या संस्थेला धन्यवाद दिले पाहिजे. कारण, ‘एसआय’ने २००३ मध्ये एक ऑर्डर काढली व त्यात हिंदूंना दर मंगळवारी तेथे पूजा, शिवाय वसंत पंचमीला सरस्वतीची पूजा करण्याची परवानगी व मुसलमानांना दर शुक्रवारी नमाज पढण्याची परवानगी मिळाली. देशातील काहीजणांना भोजशाळा म्हणजे चक्क एक हॉटेलसारखी इमारत वाटली. कारण, ‘भोज’ या शब्दाचा दुसरा अर्थ अन्न व शाळा म्हणजे स्थळ असे वाटले, तर काहींना भोजशाळा म्हणजे एक जुनी प्रार्थना म्हणण्याची प्रथा असे वाटले. परंतु, त्यामुळे या सरस्वती मंदिराचे महत्त्व कमी नव्हते. ते मंदिर एक फार मोठे विद्येचे माहेरघर होते व तेथून धार्मिक व आध्यात्मिक शिक्षण दिले जायचे. परंतु, अजून काहीजणांना असेच वाटते की, भोजशाळेत पूजा म्हणजे एक जुनी पौराणिक कथा आहे. परंतु, भोजराजा ही एक आख्यायिका (श्रशसशपवरीू) व व्यक्तिमत्व आहे. हे मंदिर म्हणजे पौराणिक कथा नाही.
११व्या शतकातील परमार घराण्यातील माळव्याच्या राजाची राजवट आहे व तेथे हे भोजशाळेचे सरस्वती मंदिर वसले होते. या भोजराजाला एक राजेंद्र चोला असा मित्र लाभला होता. तो एक मोठा योद्धा होता. त्याला शत्रूबरोबरच्या युद्धात मदत पुरवित असे. भोजराजा हा एक विद्वान राजा होता. तो बहुभाषिक व तल्लख बुद्धिमत्तेचा होता. त्याचा खगोलशास्त्र ते आर्किटेक्चर, काव्य विषयापासून ते रसायनशास्त्रापर्यंतचा गहन अभ्यास होता. त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याने ८४ विविध विषयांवर पुस्तके लिहिली होती. थोडक्यात, भोजराजा एक नवीन शोध घेणारा अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा होता. परमार घराण्यातील एक भोजराजासारखे व्यक्तिमत्त्व माहीत झाल्यावर हे भोजशाळा मंदिरावरील दोन जमातींतील भांडण ९०० वर्षांनी परत का उफाळून आले? कारण, भोजराजा हा एक धार राजधानी असलेला महाराजा होता आणि त्याने स्वतःचीअशी भारताच्या केंद्रस्थानी हिंदू संस्कृती जोपासली होती. त्याने शक्तीशाली झाल्यावर त्या मध्यवर्ती भागात अनेक देवळे बांधली होती. या देवळामध्ये बांधकामासाठी अनेक दगडी लाद्या वापरल्या होत्या. परंतु, हे बांधकामातील दगड चोरून अनेक मशिदी व दर्गा कॉम्प्लेक्सच्या बांधकामामध्ये वापरले जात होते आणि हे सगळे साहित्य ते या विकृत कॉम्प्लेक्समध्ये खोटेपणाने वापरले. पण, भोजशाळा मंदिरात जे बांधकामाचे दगड वापरले गेले होते, ते लोक ‘भोजशाळा’ म्हणून ओळखायला लागले.
परंतु, काही खोलात जाणार्या विद्वानांनी या चोरलेल्या दगडांचा ९०० वर्षांनंतर शोध घेतला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, हे बांधकामी दगड दुसर्या मंदिरातून आणलेले आहेत. उदयपूरचे प्रशास्ती म्हणतात, भोज म्हणजे मंदिरातील माती वापरलेली आहे. प्रबंध चिंतामणीमधील जैन ऋषी मेरुतुंगा म्हणतात की, त्याने धारमध्येच १०४ मंदिरे बांधली आहेत. या सगळ्या मंदिरांचा विद्ध्वंस झाला आहे. फक्त भोजशाळा मंदिराला त्या काळात कोणी हात लावलेला नाही. मुलूख जिंकणार्या इस्लामच्या जमातींनी हे बांधकामातील दगड विविध आकारांत व विविध नक्षीमध्ये भोके पाडून वापरले आहेत. ज्या मशिदी बांधल्या, त्यादेखील पुनर्वापर करूनच. म्हणजे, त्या काळापासून बांधकामात साहित्यांचा पुनर्वापर करणे सुरू झाले होते का? असासुद्धा हल्लीच्या वास्तुविशारदांना प्रश्न पडतो. मध्य प्रदेश सरकारने न्यायालयात जी कागदपत्रे सादर केली, ती कागदपत्रे भोजशाळा आणि मंदिर अशा नावाने ३१३ सर्व्हेजमध्ये आहेत. त्यात मशिदीचा उल्लेख नाही. भोजशाळा हे ‘वतन मॉन्युमेंट’ कायद्याखाली (१९०४) असल्यामुळे त्या वतनाला आपोआप संरक्षण मिळते. १९५८ सालापासून अशा वतनांचे व्यवस्थापन इत्यादी कामासाठी ‘एसआय’ संस्थेला नेमले गेले आहे. पण, त्याची मालकी राज्य सरकारकडे दिली आहे. त्यामुळे भोजशाळा हे वतन ‘वक्फ प्रॉपर्टी’ होऊ शकत नाही. हजरत कमालुद्दीन चिशती (कमाल मौला) मशीद सर्व्हेस, नंबर ३०२ मध्ये आहे. त्यामुळे याचा ३१३ शी संबंध येत नाही.काशी, मथुरा आणि भोजशाळा आणि आणखीन कितीतरी मंदिरांकरिता हे तंटे कायमस्वरुपी मार्गी लागायला हवे. मगच अयोध्येसारख्या काही निर्णयांपर्यंत पोहोचता येते, तर काहींना वेळ लागतो.
भोजशाळेविषयी आणखी माहिती
- ११व्या शतकातील सरस्वती मंदिर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाचे द्योतक आहे व धर्म व अध्यात्माचे पवित्र स्थान अनंत काळ दाखवत राहील.
- हे मंदिर राजा भोज याने बांधले. परमार घराण्यातील प्रबळ अशा धारमध्ये सन १००० ते १०५५ मध्ये त्याची राजवट होती. ही सुप्रसिद्ध अशी संस्था ‘भोजशाळा’ म्हणून ज्ञानप्रसारासाठी वाहून घेतली आहे. हे भोजशाळा मंदिर एकमेव स्थान आहे, कारण तेथे वाग्देवी सरस्वतीचे पूजन होते. सध्या ही देवी लंडनच्या म्युझियममध्ये ब्रिटिशांनी ठेवली आहे. ही भोजशाळा इमारत भव्यदिव्य व अनेक मजली आहे. या वास्तूत एक सभामंडप आहे आणि तिचे छत कलाकुसर केलेल्या अनेक स्तंभांवर बांधले आहे. शिवाय, यात हजारो दालने आहेत.
या अशा सांस्कृतिक व बौद्धिक वारसा लाभलेल्या संस्थेत महाकवी कालिदास, माघ, बाणभट्ट, भवभूती, मानतुंग, भास्कर भट, धनपाल अशा १ हजार, ४०० विख्यात विद्वानानी, धर्मशास्त्रींनी व कवींनी ज्ञानसाधना केली. अशा या वास्तूत सन १०३४ मध्ये राजा भोज याच्या आज्ञेने विख्यात शिल्पकार मंथलने संगमरवरी दगडात वाग्देवी सरस्वतीची शांत व मनमोहक मूर्ती तयार केली. परंतु, ही मूर्ती सध्या लंडनच्या संग्रहालयात आहे. ती आपल्या देशात आणण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न केले पाहिजे. न्यायालयात सध्या हिंदू व मुस्लीम जमातींमध्ये वाद सुरू आहेत. त्याचा निर्णय नक्कीच हिंदुंच्या बाजूने लागेल, अशी इच्छा आम्ही व्यक्त करतो.
अच्युत राईलकर