अयोध्येतील ‘महाराष्ट्र सदन’ दोन वर्षात पूर्ण होणार :रवींद्र चव्हाण

    11-Jun-2024
Total Views |

महाराष्ट्र सदन
 
मुंबई : उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत ‘महाराष्ट्र सदन’ उभारण्यासाठी 2.327 एकरचा भूखंड मंजूर केला असून, राज्यातील भाविकांच्या सोयीसाठी येत्या दोन वर्षात ही वास्तू बांधून पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवार, दि. 10 जून रोजी दिली. उत्तर प्रदेश सरकारच्या नियोजन विभागाच्यावतीने अयोध्या येथे राष्ट्रीय राजमार्ग, शरयू नदीजवळ ‘ग्रीन फिल्ड टाऊनशिप’ विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणी ‘महाराष्ट्र सदन’साठी भूखंड उपलब्ध करून देण्यात आला आहे. भूखंड अधिग्रहित करण्यासाठी 67.14 कोटी रुपयांची तरतूद सार्वजनिक विभागाच्यावतीने करण्यात आली आहे.
 
तसेच या इमारतीचे बांधकाम, विद्युतीकरण व अन्य सोयी सुविधांसाठी सुमारे 260 कोटीच्या निधीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच या प्रस्तावित जागेची पाहणी केली. यावेळी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव संजय दशपुत्रे, मुख्य अभियंता रणजीत हांडे यांच्यासह उत्तर प्रदेशच्या नियोजन विभागाच्या आवास योजनेचा अभियंता पी. के. सिंग, अभिषेक वर्मा, विनय चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते. “या 2.327 एकर जागेच्या व्यवहाराचा पहिला टप्पा म्हणून उत्तर प्रदेश सरकारला 10 टक्के रक्कम देण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यांत जागेचा पूर्ण मोबदला देऊन लवकरात लवकर ही वास्तू बांधण्याची कार्यवाही सुरू होईल,” असे मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.
 
महाराष्ट्रातील भाविकांसाठी अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे, यासाठी महाराष्ट्रातील अनेक कारसेवकांनी बलिदान दिले. शेकडो नव्हे, हजारो कारसेवकांनी आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. त्यांच्या त्याग आणि बलिदानातून आज रामललांचे भव्य मंदिर उभे राहिले असून बालकरामाच्या प्रसन्न आणि सोज्वळ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मंदिरात झाली आहे. दररोज लाखो भाविक अयोध्येत दर्शनासाठी जात आहेत. त्यात आपल्या महाराष्ट्रातील भाविकांची संख्या लक्षणीय आहे. या भाविकांच्या सोयीसाठी अयोध्येत लवकरच ‘महाराष्ट्र भक्त सदन’ उभे राहणार आहे.
- रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री