नवी दिल्ली : एनडीए सरकारने मंत्रिमंडळाचा खातेवाटप अधिकृतपणे जाहीर केला नसला तरी संभाव्य मंत्रालयाची माहिती समोर आली आहे. यात काही मंत्र्यांनी आपले मंत्रालय राखल्याचे दिसते आहे. भाजपच्या काही नेत्यांना पुन्हा एकदा संबंधित मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. यात अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, डॉ एस जयशंकर पियुष गोयल आणि अश्विनी वैष्णव यांनी आपली मंत्रीपदे कायम ठेवली आहेत.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री पदी अमित शाह, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण, तसेच, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर व केंद्रीय वाणिज्य मंत्री म्हणून पुन्हा एकदा पियुष गोयल यांची निवड करण्यात आली आहे. एकंदरीत, भाजपचे एकूण ७ मंत्र्यांनी आपले मंत्रालय पुन्हा एकदा राखल्याचे पाहायला मिळत आहे.
एनडीए सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जगतप्रकाश नड्डा, शिवराजसिंह चौहान, निर्मला सीतारामन, डॉ. सुब्रमण्यम जयशंकर, मनोहर लाल या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. मोदी सरकारमध्ये एकूण ३० कॅबिनेट मंत्री असणार आहेत. त्यामध्ये जनता दल सेक्युलरचे एच. डी. कुमारस्वामी, हिंदुस्तान आवाम मोर्चाचे जितनराम मांझी, जनता दल युनायटेडचे राजीव रंजन उर्फ ललन सिंह, तेलुगू देशमचे किंजरापुरा राममोहन नायडू, लोकजनशक्ती पक्षाचे (रामविलास) चिराग पासवान या मित्रपक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे.