दिल्लीत भीषण पाणी टंचाई; 'मंत्री आतिशी म्हणाल्या,....!'
10-Jun-2024
Total Views |
नवी दिल्ली : दिल्लीत पाणी टंचाईची समस्या उग्र रुप धारण करत असून लोकांची पाण्यासाठी त्रेधारतिरपीठ उडाली आहे. राज्यातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरत असून याबाबत केजरीवाल सरकार ढिम्मं असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे पाणी प्रश्नावरून राजधानी दिल्लीत सत्ताधारी विरुध्द विरोधी यांच्यात जोरदार राजकारण सुरू आहे.
दरम्यान, केजरीवाल सरकारमधील जलमंत्री आतिशी यांनी यासंदर्भात राज्याचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांची भेट घेतली आहे. मंत्री आतिशी यांनी नायब राज्यपाल यांची भेट घेत वजिराबाद बॅरेजमधील पाण्याची पातळी कमी झाल्याचे सांगितले आहे. तसेच, मुनक कालव्यातून पाणीपुरवठा कमी होत असल्याचेही नायब राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
पाणी प्रश्नासंदर्भात दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना हरिणाया सरकारशी चर्चा करणार असल्याची माहिती मंत्री आतिशी यांनी दिली आहे. विशेषतः देशाची राजधानी दिल्लीत अनेक भागात लोकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. दिल्ली सरकारच्या जलमंत्री आतिशी यांनी याप्रकरणी नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांची भेट घेतली.
आतिशी म्हणाल्या की, उपराज्यपालांनी हरियाणा सरकारशी बोलण्याचे आश्वासन दिले असून राज्याचे १,०५० क्युसेक पाणी मुनक कालव्यात सोडण्याबाबत बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्या पुढे म्हणाल्या की, दिल्ली जल बोर्डातील सीईओकडे इतर दोन महत्त्वाच्या विभागांचाही (जीएसटी, सार्वजनिक बांधकाम विभाग) प्रभार आहे. याबाबत एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.