तंत्रज्ञान क्रांतीमुळे दिव्यांगांचे जीवन सुलभ : राज्यपाल बैस

    10-Jun-2024
Total Views |

तंत्रज्ञान
मुंबई :“नजीकच्या भविष्यकाळात तंत्रज्ञान विकासामुळे दिव्यांगांच्या जीवनात सकारात्मक बदल संभवणार असून त्यांचे जीवन सुलभ होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता दिव्यांगांकरिता वरदान ठरेल, असे सांगताना विकलांगता ही गैरसोय राहील, परंतु प्रगतीत अडचण ठरणार नाही,” असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी शनिवार, दि. 8 जून रोजी केले. राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मालाड येथे 100 दृष्टिहीन विद्यार्थ्यांना ‘कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान’ आधारित ‘स्मार्ट’ चष्म्यांचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
 
“जगाच्या लोकसंख्येपैकी दर आठ व्यक्तींमागे एक व्यक्ती दिव्यांग असून भारताची दोन टक्के लोकसंख्या दिव्यांग आहे. देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविणे गरजेचे आहे. त्यांना योग्य संधी मिळाली, तर ते प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतात,” असे राज्यपाल यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयातील न्या. संदीप मेहता, मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. शिवकुमार दिघे व न्या. अभय आहुजा, राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. कमल किशोर तातेड (नि.) व ‘हेतू चॅरिटेबल ट्रस्ट’चे सचिव रिखबचंद जैन प्रामुख्याने उपस्थित होते. ‘महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग’, ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई उपनगर जिल्हा’ तसेच ‘हेतू चॅरिटेबल ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा सत्कार
‘स्मार्ट’ चष्मे खरेदीसाठी आर्थिक सहकार्य केल्याबद्दल राज्यपालांच्याहस्ते कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, तसेच इतर दानशूर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. राज्यपालांच्याहस्ते ‘हेतू चॅरिटेबल ट्रस्ट’च्या संकेतस्थळाचेदेखील यावेळी उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात 75 दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेशदेखील प्रदान करण्यात आले.