"महायुतीतील नेत्यांनी जाहीर वक्तव्य टाळवीत!"

प्रविण दरेकरांचा श्रीरंग बारणे आणि अनिल पाटलांना सल्ला

    10-Jun-2024
Total Views |
 
Pravin Darekar
 
मुंबई : महायुतीतील पक्षाच्या नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी आतील गोष्टी जाहीरपणे न बोलता पक्षाच्या पातळीवर बोलाव्यात, असा सल्ला भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी दिला आहे. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी केलेल्या विधानावरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
 
प्रविण दरेकर म्हणाले की, "महायुतीत राहून अशा प्रकारची एकमेकांबाबत नाराजी व्यक्त करणे योग्य आहे असे मला वाटत नाही. श्रीरंग बारणे यांची नाराजी ना पक्षाकरिता, ना अजित पवारांकरिता, ना शिंदेंकरिता. जर प्रतापराव जाधव यांच्या जागी बारणे मंत्री झाले असते, तर राज्यमंत्रीपदातही समाधान आहे, अशा प्रकारचे त्यांचे वक्तव्य आले असते. परंतू, आपण मंत्री झालो नाही मग कुठेतरी आपला संताप, नाराजी व्यक्त व्हायला पाहिजे या भूमिकेतून हे वक्तव्य आले आहे."
 
हे वाचलंत का? -  राष्ट्रवादी काँग्रेसचा २५ वा वर्धापन दिन! दोन्ही गटांकडून मेळाव्याचं आयोजन
 
"भाजपचे १०५ आमदार असतानाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पाच वर्ष मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. पुन्हा एक उपमुख्यमंत्री झाला. म्हणजे आमच्या आकड्याला इथे काहीच किंमत नाही का?" असा सवाल त्यांनी केला. "आम्ही एका विचारधारेवर, हिंदुत्वाच्या भूमिकेवर शिंदेंसोबत युती केली. त्याचे सुतोवाच श्रीकांत शिंदे यांनीही केले आहे. तशीच भुमिका बारणे किंवा संबंधितांनी घ्यायला पाहिजे. महायुतीतील पक्षाच्या आतील गोष्टी जाहीरपणे न बोलता पक्षाच्या पातळीवर बोलाव्यात अशी नम्र अपेक्षा महायुतीतील सर्व प्रवक्ते आणि नेत्यांकडून आहे. लोकसभेची निवडणूक संपली आहे म्हणून बारणे बोलायला मोकळे झालेत. त्यांच्यासाठी आमच्या आमदार आणि कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम केले हे त्यांनाही माहित आहे. परंतू, आपल्याला मिळाले नाही बोलले तर काय फरक पडतो. ही त्यांची भूमिका योग्य नाही," असे दरेकर म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "अनिल पाटील हे जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांनी अशा प्रकारचे जाहीर वक्तव्य करणे योग्य वाटत नाही. महायुतीत वितुष्ट निर्माण होईल असे वक्तव्य कुणी करू नये अशा सूचना सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी दिल्या पाहिजेत. छगन भुजबळ, अनिल पाटील म्हणाले त्याप्रमाणे ४० जागांच्या पक्षाला ८० जागा दिल्या तर उद्या शिंदे यांच्या पक्षालाही ८०-९० जागा द्याव्या लागणार. हे सूत्र लावले तर आमच्या १०५ जागा आहेत. मग आम्हाला २१० जागा द्याव्या लागतील. ३७० चे विधिमंडळ नाही २८८ जागा आहेत. प्रॅक्टिकल राजकीय परिस्थिती आणि निवडणूक निकालावर पक्षाच्या चार भिंतीत चर्चा व्हाव्यात. जाहीर वक्तव्य टाळावीत, अशी नम्र विनंती राहील. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत भाजपा कार्यकर्त्यांना सूचना दिल्यात तशीच विरोधकांकडूनही अपेक्षा व्यक्त केली जात आहे," असेही ते म्हणाले.