सातारा : लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा मिळतील, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे. ते गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये होण्याबद्दलही भाष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, असं मी बोललेलो नाही, असे ते म्हणाले.
शरद पवार म्हणाले की, "मागच्या निवडणूकीमध्ये काँग्रेस पक्षाला १ जागा मिळाली आणि आम्हाला ४ जागा मिळाल्या. १ जागा एमआयएमला मिळाली. एकंदरीत विरोधी पक्षांना ६ जागा मिळाल्या. आता ही संख्या ३० ते ३५ पर्यंत जाण्याची शक्यता आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "सरसकट प्रादेशिक पक्ष नाही पण काँग्रेस पक्षाच्या विचारांच्या जवळ असलेले काही पक्ष आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्थापन झाल्यापासून आजपर्यंत एकत्र काम करत आहेत. गांधी, नेहरूंची विचारधारा आणि अनेक वर्षांचा एकत्र काम करण्याचा अनुभव यामुळे हळूहळू आपण अधिक एकत्र काम करावं, अशी भावना आहे."
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, असं मी बोललेलो नाही. मी बोललो की, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष जवळपास २००१ पासून आजपर्यंत एकत्र काम करत आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दोन्ही पक्ष एकत्र होते. यावेळीसुद्धा अनेक मतदारसंघ असे आहेत जिथे काँग्रेसचा उमेदवार होता तिथे राष्ट्रवादी सहाकार्य करत होती आणि जिथे राष्ट्रवादीचा उमेदवार होता तिथे काँग्रेस सहकार्य करत होती. त्यामुळे विचारधारा एक असल्याने आणि एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे हे दोघांनाही पटल्यामुळे त्यापद्धतीने आम्ही काम करतो आहे," असे ते म्हणाले.