मुंबई : उद्धव ठाकरेंची मशाल दहशतवाद्यांच्या हाती गेली आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी महाविकास आघाडीचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारात असल्याचा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला होता. यावर आता बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरेंची ‘मशाल‘ दहशतवाद्यांच्या हाती!
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिमचे उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ व समर्थनार्थ फिरताना दिसत आहे.
उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना याकूबच्या…
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) May 9, 2024
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिमचे उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ आणि समर्थनार्थ फिरताना दिसत आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना याकूबच्या कबरीचं सुशोभीकरण, टीपू सुलतान, औरंगजेबाचा उदो उदो मोठ्या प्रमाणात झाला आणि आता थेट मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या आरोपीकडून उबाठा गटाचा प्रचार केला जात आहे.
"हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ९३ च्या स्फोटानंतर मुंबईला संरक्षण दिलं, पण उद्धव ठाकरे याच स्फोटातील आरोपीची साथ घेत आहेत. आज वंदनीय बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल? जनाब उद्धव ठाकरेंना थोडी तरी लाज वाटली पाहिजे. उद्धव ठाकरे तुमची ‘मशाल‘ दहशतवाद्यांच्या हाती देऊन पुन्हा मुंबई आणि देश पेटवायचा मनसुबा आहे का?," असा सवाल बावनकुळेंनी ठाकरेंना केला आहे.