धर्माच्या आधारे आरक्षण मागणाऱ्यांना स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांचा सज्जड इशारा

    08-May-2024
Total Views |

Swami Jitendranand Saraswati

मुंबई (प्रतिनिधी) :
"ज्यांना धर्माच्या आधारे आरक्षण (Reservation) पाहिजे त्यांनी देश सोडून पाकिस्तानात जावे", असा सज्जड इशारा अखिल भारतीय संत समितिचे सरचिटणीस स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी दिला आहे. नुकताच प्रकाशित करण्यात आलेल्या एका व्हिडिओतून त्यांनी हे मत मांडल्याचे दिसते आहे. सध्या सुरु असलेल्या निवडणुकीच्या रिंगणात आरक्षणाचा मुद्दासुद्धा चांगलाच तग धरून असल्याचेही पाहायला मिळत आहे.

स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यावेळी म्हणाले, "जे राजकीय पक्ष धर्माच्या आधारे आरक्षणाची भाषा करत आहेत, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांच्या शब्दांचे स्मरण केले पाहिजे. भारताचे झालेले विभाजन तोपर्यंत पूर्ण होणार नाही जोपर्यंत पाकिस्तान, बांगलादेशमध्ये राहिलेले एक-एक हिंदु भारतात येत नाहीत. असे बाबासाहेब म्हणाले होते. त्यामुळे धर्माच्या आधारे आरक्षण मागणाऱ्यांसाठी १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्रीच पाकिस्तान तयार करून आरक्षण दिले होते. आता जे धर्माच्या आधारे आरक्षण मागत आहेत त्यांनी कुठलाही विलंब न करता देश सोडून पाकिस्तानात जावे. हेच भारतीय संविधान आणि देशहिताचे आहे."