मुंबई (प्रतिनिधी) : संत श्री सुनील सागरजी महाराज (Sunil Sagar Maharaj) आपले जैन संतगण आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्तांसह राजस्थानच्या अजमेर शहरातील 'अढाई दिन का झोपड़ा' येथे नुकताच पाहणीदौरा केला. जैन समाजाच्या मते 'अढाई दिन का झोपड़ा' पूर्वी संस्कृत शाळा होण्याआधीसुद्धा जैन मंदिर होते.
घटनास्थळी पोहोचल्यावर यावेळी स्थानिक मौलानांसोबत वाद झाला. स्थानिक मौलानाने संतांना आत येण्यास मनाई केली. त्यावर विहिंपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर जैन संतगण आणि परिषदेचे अधिकारी आत गेले आणि 'अढाई दिन का झोपड़ा' वास्तूची पाहणी केली.
संत श्री सुनील सागर जी महाराज यावेळी म्हणाले की, "धर्म प्रेमाने जगायला शिकवतो, भांडण करायला नाही. आपल्या पूर्वजांनी धार्मिक संस्कृती कशी जपली याचा इतिहास साक्षीदार आहे. इतिहासाची पाने पाहिली तर आपली पौराणिक संस्कृती आपला इतिहास समोर येईल. संस्कृत शाळा आणि मंदिराच्या पौराणिक अवशेषांच्या खुणा आजही दिसतात. आपला सांस्कृतिक वारसा जिवंत राहिला पाहिजे."
अढाई दिन का झोपड़ा हा आपला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. त्यामुळे झालेल्या निरिक्षणानंतर भविष्यात संतगण जो काही निर्णय घेतील त्याला संपूर्ण समाज व परिषद सहकार्य करेल. असा विश्वास तरुण मेहरा यांनी व्यक्त केला.