मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा अभिनेता म्हणून ओळख मिळवणाऱ्या रवींद्र महाजनी यांच्या आकस्मिक निधनामुळे मनोरंजनसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी याने वडील रवींद्र महाजनी यांच्या पावलावर पाऊल ठेवत गश्मीरनेही अभिनयात आपली जागा निर्माण केली. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत गश्मीर महाजनी याने वडिलांच्या निधनानांतर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता असे सांगितले होते.
गश्मीर महाजनी म्हणाले की, “वडिलांच्या निधनानंतर दोन आठवड्यांनी माझ्यात आणि आईमध्ये वाद झाले होते. तेव्हा मला खूप राग आला होता. कधी कधी तुम्हाला तुमचं आयुष्य संपवून टाकावंसं वाटतं. जर माझा मुलगा शेजारच्या बेडरुममध्ये झोपलेला नसता तर कदाचित मी आयुष्य संपवलंही असतं," असं गश्मीर म्हणाला.
"आईबरोबरच्या भांडणानंतर मी टेरेसवर गेलो होतो. तेव्हा माझ्या मनात आयुष्य संपवण्याचा विचार आला होता. कारण, ते मला सहन होत नव्हतं. तेव्हा डोक्यात विचार आले की मला ५ वर्षांचा एक मुलगा आहे. मी त्याला या जगात आणलं आहे. त्यामुळे त्याला वाढवण्याची जबाबदारीही माझी आहे. पहिल्यांदा आयुष्य संपवण्याचे विचार माझ्या मनात येत होते. कधी कधी गोष्टी आपण हँडल करू शकत नाही. आणि याबाबत कोणाशी बोलूही शकत नाही," असंही गश्मीर पुढे म्हणाला.