महाराष्ट्रात ‘या’ दिवशी तुम्हाला दिसणार नाही तुमची सावली! जाणून घ्या कारण...

    04-May-2024
Total Views |

zero shadow day


मुंबई (विशेष प्रतिनिधी): शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा आहे. काही भौगोलिक आणि वैज्ञानिक कारणांमूळे ही सावली आपल्याला दिसणार नसून साधारण ३ मे ते ३१ मे या दरम्यान महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांवर असलेल्या लोकांना हे अनूभवता येणार आहे.


सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50° दक्षिण आणि उत्तरेकडे असतो म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो. त्यामूळेच, दोनदा शुन्य सावली दिवस येतात. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा. पृथ्वीवर दरवर्षी सूर्य 23.5° उत्तरेकडे व दक्षिणेकडे प्रवास करतो, त्याला आपण उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतो. याच ठिकाणी जेव्हा सूर्याचा कोनिय व्यास आणि अंशात्मक अंतर जुळते तिथे शुन्य सावली अनुभवता येते. हा कोण मोठा असल्याने दोन दिवस आपल्याला आपली सावली दुपारी काही क्षण दिसतच नाही. सूर्य दर रोज ०.५०° सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर २ दिवस राहतो, त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते.

भारताचा विचार केल्यास अंदमान-निकोबार बेटावर इंदीरा पॉइंट येथे ६.७८° अक्षवृत्तावर ६ एप्रिल आणि ५ सप्टेंबर रोजी दुपारी सुर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो. पुढे १० एप्रिल आणि १ सप्टेंबर रोजी कन्या कुमारी येथे शून्य सावली दिवस येतो तो दक्षिण भारतात तेलंगणा येथे २ मे पर्यंत विविध अक्षवृत्तावर असलेल्या शहरात शून्य सावली दिवस पाहता येतो. तर, भोपाळ जवळ २३.५° अक्षावर १८ जून रोजी शून्य सावली दिवस पाहता येतो. दक्षिणायन सुरु होताच पुन्हा भोपाळ ते अंदमान भागापर्यंत पुन्हा पावसाळ्यात शून्य सावली दिवस येतात परंतु ढग आणि पाउस असल्याने आपल्याला बहुदा ते दिवस अनुभवता येत नाही.

महाराष्ट्रात सिंधुदुर्ग ते नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा या दक्षिण आणि उत्तर सीमा आहेत. १५ ते २२ अक्षांश उत्तर दरम्यान जी शहरे येतात तिथे ३ मे ते ३१ मे दरम्यान शून्य सावली दिवस अनुभवता येतो. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे ३ मे रोजी तर धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येतो. भारतातून शेवटी मध्यप्रदेशातील भोपाळ जवळून २३.५०° अंशावरून कर्कवृत गेले आहे, त्यामुळे शून्य सावलीचा हा शेवटचा भूभाग आहे. भारतात २३.५०° अंशाच्या पुढे दिल्ली, हिमाचल, काश्मीर इथे कुठेही शून्य सावली घडत नाही.

महाराष्ट्रातील शून्य सावली दिवस कोल्हापूर जिल्ह्यात १५.६° अक्षांश ते धुळे जिल्यात २१.९८° अक्षांश ह्या दरम्यान शून्य सावली दिवस पाहता येणार आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत,त्यामुळे सर्व शहरे आनी गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे, त्यामुळे आपण दुपारी १२.०० ते १२.३५ या कालावधीमध्ये सूर्य निरीक्षण करावे. समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळ्या जागी आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात करता येऊ शकेल. दोन-तीन इंच व्यासाचा आणि साधारण एक दोन फूट उंचीचा पोकळ प्लास्टिक पाईप, कोणतीही उभी ठेवता येईल अशी वस्तू किंवा स्वतः उन्हात सरळ उभं राहून ही हा प्रयोग करता येऊ शकतो. हा एक भौगोलिक, गणितीय आणि वैज्ञानिक असा तिन्हींचा एकत्रित मिलाफ असलेला हा प्रयोग आहे. त्यामूळेच विद्यार्थी आणि नागरिकांनी या भौगोलिक घटनांचा आभ्यास आणि निरीक्षण करावं असं आवाहन खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी केलं आहे.