पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव घेताच, डोळ्यांसमोर सर्वप्रथम उभे राहतात, ते त्यांनी नदीकाठी उभारलेले देखणे घाट. केवळ घाटच नाही, तर असंख्य मंदिरे, किल्ले, राजवाडे, तलाव, विहिरी, बारवांच्या निर्मितीतूनही अहिल्यादेवींची सौंदर्यदृष्टी प्रतीत होते. तेव्हा या लेखातून अहिल्यादेवींच्या स्थापत्यक्षेत्रातील एकूणच योगदानाविषयी आणि त्यांच्या त्यामागील कलात्मक दृष्टिकोनाचा आढावा घेतला आहे.
मध्ययुगीन कालखंडामध्ये भारताच्या इतिहासामध्ये ज्या महान स्त्रिया होऊन गेल्या, त्यांच्यामध्ये अहिल्यादेवी होळकरांचे स्थान अद्वितीय. जन्माने मराठी असणार्या या कन्यारत्नाने आपल्या धार्मिक व सामाजिक, राजकीय कर्तृत्वाने भारतभर मोठी कीर्ती नावलौकिक मिळविले. इ. स. 1754 मध्ये खंडेराव होळकराचा मृत्यू झाला व पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अकाली वैधव्य आले. पुढे इ.स. 1766 मध्ये सासरे मल्हारराव होळकर यांचेही निधन झाल्यामुळे राज्यकारभाराची सर्व जबाबदारी अहिल्यादेवी होळकर यांच्यावर आली. त्याचबरोबर त्यांच्या घरातील त्यांची मुलगी, सुनांसह 18 स्त्रिया सती गेल्या. अशा बिकट परिस्थितीत मोठ्या अचाट धैर्याने सर्व राज्यकारभाराचे रक्षण तर केलेच, परंतु मल्हारराव होळकरांचा लौकिक कायम राखला. त्यांनी राज्याची घडी विस्कटू दिली नाही, तर होळकरशाहीचे वैभव कायम राखले व अनेक सत्कृत्ये करून ‘पुण्यश्लोक’ होण्याचा मान या ‘महासाध्वी’ स्त्रीने मिळविला.
अहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या सत्कृत्याची यादी फार मोठी आहे. अहिल्यादेवी शिवभक्त होत्या, त्यांनी देशभर खूप मंदिरांचा जीर्णोद्धार केला. उदा. आनंद काकन येथील विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोध्दार केला, काशी येथील काशी-विश्वेश्वरांच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, गया येथील विष्णू मंदिर, सोमनाथ येथील महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, तर मराठवाड्यातील परळी वैजनाथ व वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. याशिवाय भारतामध्ये अनेक ठिकाणी स्वखर्चातून मंदिराची उभारणी केली. त्यामध्ये आलामपूर, उज्जैन, ऋषिकेश, काशी, कुरूक्षेत्र, गंगोत्री, जेजुरी, नाशिक, पंढरपूर, चौंडी इत्यादी ठिकाणी मंदिराची उभारणी केली. याव्यतिरिक्तही अनेक ठिकाणी मंदिरे बांधली. यामध्ये सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण कार्य म्हणजे अहिल्यादेवी होळकरांनी फक्त मंदिरांचा जीर्णोद्धार व उभारणीच केली नाही, तर त्यांनी पुनःश्च हिंदू धर्म रक्षणाचा भक्कम पाया उभारण्याचा आरंभ केलेला दिसतो. त्यामुळेच त्यांना ‘हिंदू धर्मरक्षक’देखील म्हटले जाते. अहिल्यादेवी होळकरांनी जलसंधारण क्षेत्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये जे कार्य केले, त्याच्या तोडीचे कार्य अन्य कोणत्याही व्यक्तीने किंवा राज्यकर्त्याने केले नाही.
जनकल्याण, धर्मपरायणता व स्त्रीविषयी वाटवारी अनुकंपा, मुक्या प्राण्यांविषयी असणारी कळकळ यामधून त्यांनी भारतभर दुर्गम ठिकाणी नद्यांवर घाट बांधले. नर्मदा ही प्राचीन काळापासून प्रवाहित असणारी नदी ही केवळ नदी नाही, तर भारताच्या अविरत संस्कृतीचाही प्रवाह आहे. नर्मदा नदीच्या किनार्यावर लोकमाता अहिल्यादेवींनी आपला राज्यकारभार केला. अहिल्यादेवी यांचे स्थापत्यशास्त्रात बहुमोल योगदान आहे. हिंदवी स्वराज्यात स्थापत्यशास्त्रात अनेक प्रयोग झाले. किल्ल्याचे गोमुखी प्रवेशद्वार, बुरूजांचे बांधकाम आणि सामरिकदृष्ट्या केलेली किल्ल्यांची रचना, पुढे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी निर्माण केलेल्या मंदिरे, किल्ले, राजवाडे आणि घाटांच्या स्थापत्यात आपल्याला एक सौंदर्यदृष्टी आणि कलात्मकता दिसून येते. म्हणूनच पुरातन महेश्वरसारख्या क्षेत्राचे पावित्र्य जसे आपल्याला जाणवते, तसे अहिल्यादेवींच्या काळात निर्माण झालेल्या वास्तुकला मोहून टाकतात. अहिल्याराणी होळकर या मराठेशाहीतील एक देदीप्यमान नंदादीपच! उत्तरेत राहून अलम हिंदुस्थानात त्यांनी राष्ट्रकार्य निर्माण केले. राजकारण-समाजकारण यांसोबत मध्य प्रदेशात आजही पाहिले, तर जागोजागी अहिल्यादेवींच्या दक्ष राज्यकारभाराच्या खुणा ठळक दिसतात. शाहीर अनंत फंदी यांनी महेश्वरला भेट दिली होती. महेश्वरच्या वैभवाचे वर्णन करणारा पोवाडा त्यांनी रचला होता. त्या पोवाड्यात अहिल्यादेवी यांनी बांधलेल्या घाटांचे वर्णन आले आहे.
नर्मदा तर निकट घाट।
बहुत अफाट पायर्या दाट।
चिरेबंदी वार मुक्तीची शिवालये।
कैलास साम्यता नाना परीची॥
रचली रामकृष्ण मंदिरे।
स्वामी पांडे यांनी ‘अहिल्या स्मारिका’ या ऐतिहासिक मासिकात ‘अहिल्यादेवींद्वारा निर्मित घाट’ या लेखात घाटांचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे. महेश्वर येथील घाटांत जी एकता व एकसंघता आहे, ती मजबूती आणि स्थापत्यशास्त्राच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. येथील घाटांची संख्या 28 आहे. मुख्य घाट आकाराने मोठा आहे. त्याची एका बाजूची लांबी 121 फूट, तर रुंदी 150 फूट आहे. बाजूला नर्मदेचा वेगवान प्रवाह आहे. त्याला अडविण्याचे काम हा घाट करतो. महेश्वर येथील घाटांबद्दल समसेवक गर्ग यांनी ‘अहिल्या स्मारिका वर्ष 1979’ यामध्ये ‘अहिल्या की नगरी महिपती घाट स्थापत्य’ या संशोधन लेखात महेश्वरच्या घाटाचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे. महेश्वर येथे एकूण 18 घाट आहेत. प्रयाग या ठिकाणी बांधण्यात आलेला घाट अत्यंत विशाल आहे, तर ऑक्टोबर 1785 मध्ये मनिकर्णिका घाट बांधल्याची नोंद सापडते. पूरनियंत्रण, भूस्खलन प्रतिबंध आणि पाठविण्याच्या सोयी या भूमिकेतून त्यांनी देशभरात शेकडो घाट बांधले. ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांची दुरुस्ती करून त्या ठिकाणी कुंडांची तथा बारवांची निर्मिती केली. परळी वैजनाथ मंदिर आणि वेरूळच्या घृष्णेश्वरजवळ उभारलेले बारव आणि घृष्णेश्वर मंदिर हे मराठा कालखंडातील स्थापत्य व त्यांचा सोयीविषयक दृष्टिकोन स्पष्ट करण्यास पुरेसे आहेत.
वेरूळ येथील अहिल्यादेवींनी उभारलेली बारवेची गणना भारतातील उत्तम बारव स्थापत्यात केली जाते. शिवाय निकाड, बद्रिनारायण, रावेर, वृंदावन इत्यादी ठिकाणी मंदिरासोबत बारवांची त्यांनी निर्मिती केली. केदारनाथ येथे एक धर्मशाळा आणि पाण्याचे कुंड बांधले, जे जमिनीपासून 300 फूट उंच आहे. त्यांनी आपल्या व्यक्तिगत संपत्तीतून तसेच लोकांना आवाहन करून ही निर्मिती केली. त्र्यंबकेश्वर येथे सुंदर अशी दोन देवालयांची निर्मिती करून भाविकांसाठी व जलसंवर्धनासाठी दोन तलाव बांधले. हे दोन्ही तलाव दगडाने बनविले आहेत. अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या जलव्यवस्थापन पद्धतींपैकी 90 टक्के विहिरी, बारव, तलाव आजही वापरात आहेत. अहिल्यादेवींनी आपल्या 30 वर्षीय कालखंडामध्ये त्यागाशी, कर्माशी सांगड घालून जीवन व्यतीत करत प्रजेच्या हिताकडे लक्ष देऊन भारतामध्ये धर्मशाळा व अनेक ठिकाणी अन्नछत्रे चालविली. प्रजेची सेवा केली. मुक्या प्राण्यांवर त्यांचे विशेष प्रेम होते. म्हणून प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी हौद बांधले. यात्रेकरूंसाठी रस्तोरस्ती पिण्याच्या पाण्याची सोय केली. या जनकल्याणासाठी केलेल्या कामावरून त्यांना देवत्व दिले गेले, एवढी त्यांची लोकप्रियता होती. अहिल्यादेवींनी निर्माण केलेला जलव्यवस्थापनाचा वारसा जतन करण्याची मात्र आज फार गरज आहे.
जलव्यवस्थापनाचे महत्त्व अगदी प्राचीन कालखंडापासून अस्तित्वात असलेले दिसते. कारण, पंचमहाभूतांपैकी अग्नी आणि जल हे सर्व मानवी समाजाच्या कृत्यांचे साक्षीदार मानले जातात. कोणतेही धार्मिक कृत्य हे अग्नी आणि जलाच्या अस्तित्वाशिवाय पूर्णत्वास जाऊ शकत नाही. भारतीय समाजातील कोणत्याही सामाजिक अथवा धार्मिक विधीमध्ये उदाहरणार्थ, नामकरण, व्रतबंध, विवाह, देवदेवतांची प्राणप्रतिष्ठा, राज्यरोहण फार काय मरणानंतरच्या दशक्रिया विधीसाठीही नदीच्या किंवा पारंपरिक जलाशयाच्या जलांनी भरलेल्या अशा मातीच्या किंवा धातूच्या कलशाचे विधीपूर्वक पूजन करण्याची प्रथा आहे. त्यामुळे हिंदू संस्कृतीमध्ये घाटांचे महत्त्व हे अनन्यसाधारण असल्याचे दिसते. भारतीय समाजातील प्रत्येक श्रद्धाळू व्यक्ती ही जलाची पूजा करत असतेे आणि सूर्याला अर्ध्य देत असतेे. ‘हे तुझेच आहे. त्याचा तू विकास करून ते आम्हास परत दे, आम्ही ते तुझ्या विकासासाठी वापरू,’ अशा प्रकारची ही परस्पर समजूत असते आणि या सर्व प्रक्रियेची सुरुवात अगदी आरंभापासून म्हणजे ऋग्वेदकाळापासून झाल्याचे त्यामधील अनेक सूक्तांवरून स्पष्ट होते. जनमानसांत पाण्याशी असलेले भावनिक नाते अनादी काळापासून लौकिक परंपरांतून असलेले निदर्शनास येते. ऋग्वेदकालीन परंपरा आज आपणास पाहावयास मिळत नसली, तरी ऋग्वेदातील सूक्ते ही त्या काळातील समाजमनाची प्रतिक्रिया असल्याने जलाशी संबंधित ऋग्वेदातील काही सूक्ते, त्यांमध्ये ‘वायुसूक्त’, ‘गोसूक्त’, ‘कृषीसूक्त’, ‘जलदेवतासूक्त’, पर्जन्यसूक्त’, ‘मंडूकसूक्त’ आणि ‘नदीसूक्त’ यांचा समावेश होतो.
यांपैकी ‘पर्जन्यसूक्त’ हे अतिशय महत्त्वाचे असून त्यामधील चार ऋचा महत्त्वाच्या वाटतात व या सर्व गोष्टींचा विचार करता, या जलव्यवस्थापनांचे घाट बांधणीचे महत्त्व हे अहिल्यादेवी होळकरांना चांगलेच कळले होते, हे लक्षात येते. मल्हारराव होळकरांनी मोठ्या काटकसरीने वागून 15 ते 16 कोटी रुपये खासगी संपत्ती जमा केली होती. त्याचाच वापर अहिल्यादेवींनी दानधर्म करण्यासाठी केला, अशाप्रकारे काही विद्वान मीमांसा करतात. पण, ते खरे वाटत नाही. कारण, अहिल्यादेवींचा हा वारसा त्यांच्यानंतरच्या काळात होळकर घराण्यातील इतर राजपुरुषांनी चालविल्याचे दिसते. यासंबंधित तुकोजी होळकरांनी केलेल्या कार्यासंबधीचे दोन शिलालेख उपलब्ध झाले आहेत. हे शिलालेख ‘बडा तलाव’ या नावानेच ओळखले जातात. ते इंदोर जिल्ह्यातील देलापूर तालुक्यातील वडा या नावाने ओळखल्या जाणार्या गावीच आहेत. त्यानुसार, (इ.स. 1869) तुकोजी होळकरच्या आज्ञेवरून लालजी अंबाजी या सुभेदाराने उपरोक्त तलावाची पाळी बांधल्याचे म्हटले आहे. त्या कामासाठी 57 हजार, 951 रुपये खर्च आल्याची नोंद करण्यात आलेली आहे व दुसर्या शिलालेखात कार्याचा आरंभ कधी झाला व हे काम पूर्ण कधी झाले, याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या नोदींनुसार इ.स. 1869 मध्ये कार्य सुरू झाले व ते 1875 साली संपले. अशाचप्रकारची नोंद मुल्हेर येथील किल्ल्यावर केलेली आढळली. या सर्व घटकांतून, पुराव्यांतून पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलेले कार्य यामध्ये धार्मिक, सामाजिक, राजकीय व यांसोबतच त्यांनी निसर्ग संरक्षणासाठीही मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन अनेक घाटांची निर्मिती व जलव्यवस्थापनाचे महान कार्य केले व त्याचप्रमाणे त्यांचा आदर्श घेऊन सद्यस्थितीमध्ये जलसंस्कृतीचे, जलव्यवस्थापनाचे कार्य करणे नितांत गरजेचे आहे. कारण, पूर्वी जलसंस्कृतीचा जसजसा झपाट्याने विकास होत गेला, तसा आज त्याच वेगाने र्हास होत आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जलव्यवस्थानाचा अभ्यास व आदर्श ही काळाची गरज बनली आहे.
डॉ. नम्रता भोसले
(लेखिका विशेष निमंत्रित सदस्या, छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधना समिती, महाराष्ट्र शासन छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र आहेत.)