भारताच्या इतिहासात काही मोजक्या महिला राज्यकर्त्या होऊन गेल्या, ज्यांनी अतिशय कुशलतेने व कर्तबगारीने राज्य सांभाळले. एवढेच नव्हे, तर ते अधिक समृद्ध बनविले. अशा राज्यकर्त्यांमध्ये देवी अहिल्याबाई होळकर यांचे नाव इतिहासात अग्रस्थानी राहिले आहे. त्यांच्या प्रशासकीय कार्यकौशल्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
सर जॉन माल्कम हा तत्कालीन मध्य प्रांताचा गव्हर्नर आपल्या ‘मेमरी ऑफ सेंट्रल इंडिया इन्क्ल्युडिंग माळवा’ या ग्रंथात लिहितो की, “अहिल्याबाई या माळव्यात उत्तम प्रशासनाचे प्रतीक बनल्या होत्या आणि त्याबाबत सर्वांचेच एकमत होते. त्यांचे नाव हे सर्वोत्तम अधिकारी म्हणून घेतले जात असे. अहिल्याबाईंचे प्रशासन एक उत्तम उदाहरण म्हणून घेतले जाते.” तसेच तत्कालीन ब्रिटिश व्हॉईसराय लॉर्ड अलेंबरो लिहितो की, “अहिल्याबाई सर्वोत्तम राज्यकर्ती व सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी आहेत. अर्थातच, उत्तम प्रशासक या गुणांची तुलना होताना लोकहिताचा विचार, प्रजेचे सुख-समाधान, शेतकरी, व्यावसायिक, नागरिक यांच्या कल्याणाचा विचार, समभाव, समतोल करप्रणाली, न्यायप्रियता, स्त्री सन्मान, योग्य परराष्ट्र धोरण अशा सर्व अंगांचा विचार होतो. या दृष्टीने अहिल्याबाई या एक उत्तम प्रशासक असल्याचे निदर्शनास येते.”
अहिल्याबाईंनी राज्य कारभाराची सूत्रे 1766 मध्ये मालेराव यांना सुभेदाराची वस्त्रे मिळवून देऊन हाती घेतली होती. परंतु, वर्षभरातच मालेरावांचा मृत्यू झाला व सर्व प्रशासनिक कारभाराची जबाबदारी अहिल्यादेवींनी स्वीकारली. मल्हारराव होळकर यांच्या तालमीत तयार झाल्याने दूरदर्शीपणा, स्वाभिमान, संयम, शुद्ध चारित्र्य, औदार्य, न्याय-निष्ठुरता या गुणांची रुजवण त्यांच्या अंगी झाली होती. राजनीतीसोबत प्रशासनाचे, न्यायदानाचे धडे त्यांनी उत्तम पद्धतीने आत्मसात केले होते. त्यामुळे रयतेच्या मनात त्यांच्याविषयी अपार श्रद्धा होती. थोरले माधवराव पेशवे ही त्यांना पत्र लिहिताना आदराने ‘गंगाजळ निर्मळ मातोश्री अहिल्याबाई’ असा मायना लिहितात. हा आदर त्यांनी विश्वासाने संपादन केला होता व रयतेचा, अमात्य, मंत्रिमंडळ, सोबत इतर प्रांतांतील राजे यांचाही विश्वास त्यांनी संपादन केला होता. राजा असलो तरी बर्याचदा सर्व बाबी आदेशानेच होतात असे नाही, तर प्रजेच्या मनात राजाविषयी विश्वासाचे नाते हवे आणि असे नाते भीतीतून निर्माण न होता, आपुलकी व आदरयुक्त अनुबंधातून निर्माण व्हायला हवे, तरच राजाचे मोठेपण सिद्ध होते. अहिल्याबाईंबाबत असेच नाते निर्माण झाले होते. त्यामुळे त्या एक उत्तम प्रशासक म्हणून यशस्वी झाल्या.
सुधारक प्रशासक
मल्हारराव यांच्यापासून चालत आलेल्या राज्यकारभारात अहिल्याबाईंनी अधिक सुधारणा केल्या. राज्याची विभागणी ही लहान गावे, मोठी गावे, परगणा, महाल, सुभा अशी अहिल्याबाईंनी केली. प्रत्येक गावात कर्तव्यतत्पर अधिकारी नेमला. प्रत्येक गावाहून बारीकसारीक माहिती लेखी व तोंडी स्वरूपात सुभ्यास पोहोचवण्याची व्यवस्था केली होती. करपद्धतीही सौम्य केली होती. एकदा कर दिल्यावर कोणताही त्रास होत नसे. नियमांपेक्षा अधिक कर अधिकारी वसूल करीत नसत. जर कोणीही जाणूनबुजून अशी कृती केली, तर त्यास शिक्षा होत असे. ही सारावसुली उत्पन्नाच्या प्रमाणात असे. अतिवृष्टी किंवा दुष्काळ पडल्यास, सारा तहकूब होत असे. रस्त्याच्या दुतर्फा ओसाड पडीक जमिनीवर लिंब, आंबा, चिंच, वड, पिंपळ अशी झाडे अहिल्याबाईंच्या आदेशाने बहरली. प्रत्येक शेतकर्याने किमान 20 झाडे लावलीच पाहिजेत, असा त्यांचा दंडक होता. यातील 11 झाडे सरकारी मालकीची, तर नऊ झाडे शेतकरी यांच्या मालकीची असा ‘नौ ग्यारह कानून’ त्यांनी तयार करविला होता. त्यांनी नदीतील पाण्याचा एक प्रवाह बाजूला करून तो कपडे धुणे, जनावरांना पाणी व शेती आदींसाठी राखीव ठेवला होता. पाण्याच्या उत्तम नियोजनामुळे त्यांच्या 28 वर्षे कारकिर्दीत कधीही दुष्काळ पडला नाही. वनीकरण, जलसंवर्धन खाते राज्यात निर्माण केले होते. एका वृक्षाची तोड म्हणजे एका जीवाची हत्या, असा समजही अहिल्यादेवींनी रूढ केला होता. तसेच पाण्याच्या सोयीकरिता विविध ठिकाणी विहिरी, तळी, बारवा, कुंडे अहिल्याबाईंनी बांधली. नद्यांवर बंधारे बांधले.
कर्तव्यकठोर प्रशासक
अहिल्यादेवी एक कर्तव्यकठोर प्रशासक होत्या. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे एकदा त्यांचे पती खंडेराव, त्यांना तनखा मिळाला असूनही अधिक मिळावा, अशी मागणी करू लागले. त्यावेळी हिशेबाची खतावणी दाखवून अहिल्यादेवींनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला. परंतु, आम्हाला तनखा हवा उपदेश नको म्हणून खतावणी भर दरबारात फेकून दिली, तेव्हा अहिल्यादेवींनी दरबाराच्या बेअदबीबद्दल त्यांना 25 मोहरांचा दंड ठोेठावला आणि तो त्यांच्या तनख्यातून वसूल करण्याचा आदेश दिला. असेच एकदा चांदवडचा मामलेदार, राव शिवलाल कोतवाल यांनाही पत्र लिहून चुकीच्या वागणुकीबद्दल अहिल्याबाईंनी खडसावले होते.
मुत्सद्दी प्रशासक
अहिल्यादेवींचे एकमेव सुपुत्र सुभेदार मालेराव यांचा अकाली मृत्यू झाला. त्यावेळी चंद्रचूड या दिवाणाने अहिल्याबाई यांना स्वतःच्या नात्यातील दत्तक पुत्र घेण्यास सांगितले. परंतु, अहिल्याबाई त्यास जुमानत नाहीत, हे कळताच त्याने राघोबादादा पेशवे यांस पत्र लिहून कळविले की, होळकरशाही बेवारस झाली आहे. उतावीळ राघोबादादा 50 हजार फौज घेऊन चालून आला. उज्जैनजवळ त्यांचा तळ पडला. त्यांनी राणीला निरोप धाडला की, राज्य मुकाट्याने आमच्या स्वाधीन करा, नाहीतर युद्धाला तयार राहा. अहिल्यादेवींना या आक्रमणाची खबर आधीच मिळाली होती. त्यामुळे त्यांनी भराभर सूत्रे हलविली व शिंदे, भोसले, पवार आदी मराठे सरदार यांना पत्रे पाठवून या आणीबाणी प्रसंगी सैन्यासह मदतीस येण्याचे आवाहन केले. स्त्रियांना प्रशिक्षण देऊन 500 स्त्री सैन्य पथक तयार केले. शिवाय पुण्यास माधवराव पेशवे यांनाही पत्र लिहून राघोबादादा यांच्या या आगळीकीबद्दल कळविले. माधवराव यांनी लगेच उत्तर पाठविले की, “तुमच्या दौलतीविषयी जो पापबुद्धी धरेल, त्याचे बेलाशक पारिपत्य करावे.” इतर सरदारांनीही अहिल्याबाईंच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राघोबा यांना कळविले की, “दौलतीच्या हिताचे इतर कुठलेही काम सांगा, पण अहिल्याबाईंच्या विरुद्ध लढा म्हणाल तर आमच्याकडून होणार नाही.”
याप्रमाणे सर्व सिद्धता झाल्यावर अहिल्याबाईंनी राघोबांना निरोप धाडला की, “तुमच्यासारख्या पराक्रमी पुरुषाने एका स्त्रीवर असे आक्रमण करणे योग्य नाही. या लढाईत तुम्ही जिंकलात तर काही नवल नाही. परंतु, चुकून तुम्ही हरलात तर मात्र सर्व जगी तुमची नाचक्की होईल व तुम्हास कुठे तोंड दाखवण्यास जागा राहणार नाही, याची जाणीव ठेवावी.” ही मात्रा लागू पडली व युद्धासाठी आलेले राघोबा सांत्वना देऊन गेले, हा त्यांचा मुत्सद्दीपणा प्रशासक म्हणून उत्तम गुण दर्शवितो. एकदा असेच महादजी शिंदे एक स्त्री समजून भर दरबारात त्यांना बोलून गेले की, “बाईसाहेब, आपण इतकी अंगवळणाची बोलणी बोलता, परंतु आम्ही पुरुष आहोत, आम्ही आपले ढंगावर आलो तर आपण काय कराल?” यावर क्षणाचाही विलंब न लावता, अहिल्याबाई म्हणाल्या की, “स्त्रिया म्हणजे सुपारीची खांडे समजून त्यांस गिळता. तर हिंमत धरून महादजी तुम्ही इंदोरवर चालून या. हत्तीच्या पायातील साखळदंड तेच दिवशी तुमचे पायी न अडकवले तर सुभेदारांची सून म्हणवणार नाही.” त्यांच्या अशा बोलण्याने भल्याभल्यांची फजिती होई. ते मूग गिळून गप्प बसत असत. (संदर्भ -वेध अहिल्याबाईंचा)
प्रजाहितदक्ष प्रशासक
राजमुद्रा ही प्रशासकीय कामाकाजात अत्यंत महत्त्वाची असते. ती त्या राज्याची ओळख असते. अहिल्याबाईच्या राज्यमुद्रेवर ‘श्री शंकर आज्ञावरून...’ असे लिहिले होते. अर्थातच ‘इदं न मम’ म्हणजेच ‘हे राज्य माझे नसून शिवशंकराच्या आज्ञावरून चालले आहे.’ छत्रपती शिवाजीराजे यांच्या स्वराज्यात अहिल्याबाई यांचे राज्य रयतेचे राज्य होते. लोकाभिमुख राज्यकारभार असल्याने प्रजा सुखी-समाधानी होती. नवीन राजधानी नर्मदा तीरावरील प्राचीन माहेश्वर येथे अहिल्याबाईंनी हलविली व येथे पेठा वसवून वस्त्रोद्योगास चालना दिली. सुंदर तलम साडी व धोतरासाठी संपूर्ण भारतात माहेश्वर प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे अनेक विणकर कलाकार स्त्रियांना रोजगार मिळाला. त्यामुळे ‘चालू द्या होळकरी टाकी’ ही म्हण रूढ झाली. हातांना काम मिळाले. राज्याचे उत्त्पन्नही वाढले. त्यांनी दारूबंदी केली. विधवांना पतीच्या संपत्तीवर हक्क प्राप्त करून दिला. दत्तक हक्क मान्य केला, हे त्या काळातील प्रगतीचे, प्रबोधनाचे, समाजसुधारणेचे एक पाऊल होते, असे म्हणता येईल.
भिल्लांचा बीमोड
सातपुडा पर्वतरांगा व विंध्य यात निमाड जिल्हा येतो. या मुलुखात भिल्ल, कोरकू, गोंड यांची वस्ती होती. त्यामुळे दळणवळणास हा भाग असुरक्षित समजला जात असे. या भागात शांती व सुव्यवस्था राखण्यासाठी अहिल्याबाईंनी ‘भिलकवडी’ हा पूर्वापार चालत आलेला कर वसूल करण्याचे अधिकार या जमातीस दिले व आजूबाजूची जमीन ही कसण्यासाठी त्यांना दिली. त्यामुळे कुठलीही लूटमार न करता शेतीद्वारे आपली उपजीविका करणे त्यांना शक्य झाले. तसेच प्रवाशांच्या संरक्षणाची जबाबदारीही त्यांच्याकडे दिली. एवढेच नव्हे तर कुठे लूटमार झाल्यास त्या बाबत त्यांना जबाबदार धरले जाईल, असे विदीत केले. काही मंडरूप सिंहसारख्या लुटारूस कठोर शिक्षाही केल्या. तात्या जोग म्हणतात, “अहिल्याबाईंनी उदारता, चांगुलपणा आणि समाधानकारक पद्धतीने भिल्ल, लुटारू यांचा प्रश्न सोडविला. ती पद्धत अतिशय अद्वितीय आणि परिणामकारक आहे.”
न्यायप्रिय प्रशासक
प्रजेला मोफत न्याय मिळे. न्यायात विलंब म्हणजे न्याय देण्यास नकार असे त्या समजत. त्यामुळे त्या याबाबतीत खूप काळजी घेत. निःपक्षपातीपणे तटस्थ न्याय ही त्यांची ओळख होती. त्यांनी प्रजेला त्रास दिल्याबद्दल आपल्या मामलेदार यांनाही खडसावले होते. वसुलीबाबत त्यांचे शेगाव परगण्यातील अधिकार्यांची तक्रार प्राप्त होताच, त्यांनी त्यास पत्र पाठवून कानउघाडणी केली होती. निपुत्रिक विधवांच्या मिळकती जप्त न करता दत्तक विधानानव्ये त्यांची विल्हेवाट लावावी, असे निवाडे त्यांनी दिले. त्यावर अशा विधानावर सरकारी पट्टी तरी लावावी, असे काही दरबारी मंडळी म्हणाली. त्यावर अहिल्याबाई कडक निर्णायक स्वरात म्हणाल्या, “हा न्यायधर्म नव्हे, तर लाच घेणे झाले.” त्यावर कोणीही पुढे काहीही बोलले नाही. न्यायाबाबत त्यांची दृष्टी अगदी स्पष्ट होती. कोणतीही स्त्री न्याय मागण्यासाठी त्यांच्या दरबारी सहज येऊ शकत असे. सर जॉन मालकम म्हणतो की, “अहिल्याबाईंसारखी न्यायाधीश पुन्हा होणे नाही.”
कलेस राजाश्रय
साहित्य, संगीत, चित्रकलेला अहिल्याबाईंनी प्रोत्साहन दिले. प्रसिद्ध कवी मोरोपंत, शाहीर अनंत फंदी यांचा सन्मान केला. राजस्थान येथील संस्कृत पंडित खुशालीराम भट्ट यांना राजाश्रय दिला. मूर्तिकार, गायक, चित्रकार यांना सरकारी नोकर्या दिल्या, त्यामुळे राज्यात सुखासोबत समृद्धीही नांदू लागली होती.
सैन्य व्यवस्था
अहिल्याबाईंच्या प्रशासनातील महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांची सैन्य व्यवस्था होय. या बाबतीत त्यांचे धोरण समकालीन राज्यकर्त्यांपेक्षा एक पाऊल पुढे होते, असे म्हणावयास हरकत नाही. कारण, आपल्या सैन्यात पाश्चात्त्य धर्तीवर तुकड्या निर्माण करण्यासाठी त्यांनी कर्नल जे. पी. बॉयड यांची नियुक्ती करारपत्राने केली होती व सैन्याचे वेतन ठरविण्यात आले होते. बॉयडला केवळ बंदुका खरेदी करण्याचे अधिकार होते, त्यासाठीचा दारुगोळा मात्र राज्याद्वारे पुरवला जात असे. संपूर्ण सैन्य नियंत्रणात होते. आदेशानुसार काम करण्याचे बंधन त्यांच्यावर घालण्यात आले होते. अहिल्याबाईंच्या काळात सर्वत्र राजेशाही असली, तरी अहिल्याबाईंनी मात्र आपल्या राज्यात आधुनिक राज्यघटनेतील कल्याणकारी राज्याची प्रत्यक्ष उभारणी करून तसा लोकाभिमुख कारभार चालविला. त्यामुळे त्यांचे प्रशासन हे उत्तम प्रशासन असून त्या एक उत्तम व कुशल प्रशासक ठरतात.
स्नेहलता स्वामी (बिंदू)