मुंबई: गरजूंना पौष्टिक जेवण दैनंदिनरित्या पुरवण्यासाठी मलाबार समूहाद्वारे सुरू असलेला ‘भूकमुक्त जग’ (हंगर-फ्री वर्ल्ड) हा सीएसआर कार्यक्रम अधिकाधिक लोकांना आणि शहरांचा समावेश करत विस्तारण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास लक्ष्य २ - शून्य भूक यानुसार योजित या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाअंतर्गत सध्या ३१,००० अन्न पाकिटांचे वितरण करण्यात येत आहे. विस्तारीत कार्यक्रमााच भाग म्हणून आता दररोज ५१,००० पौष्टिक अन्न पाकिटांचे वाटप केले जाईल.
मुंबईत आयोजित कार्यक्रमात जागतिक भूक दिन पाळण्यात आला. त्याप्रसंगी, प्रमुख पाहुणे बृहन्मुंबई महानगर पालिका आयुक्त, माननीय भूषण गगराणी, यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अंधेरी येथील मलाबार कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मलाबार व्यवस्थापन संघाने या महत्त्वपूर्ण उपक्रमाशी बांधिलकीची शपथ घेतली.
मलाबारचे स्वयंसेवक पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयामध्ये जमले. सेठ जीएस मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आणि केईएम रुग्णालयाने मलाबारच्या संघासह प्रमुख पाहुणे माननीय भूषण गगराणी यांचे स्वागत केले. या कार्यक्रमात ‘हंगर फ्री वर्ल्ड’ या विषयावरील एक छोटेसे सादरीकरण आणि मलाबार समूहाचे सदस्य आणि अधिष्ठाता यांची छोटेखानी भाषणेही या प्रसंगी झाली. त्यानंतर स्वयंसेवकांनी केईएम रुग्णालयाबाहेर गरजूंना अन्नाचे वाटप केले.‘भूकमुक्त जग’ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, मलाबार दररोज २,००० अन्न पाकिटांचे वितरण मुंबईत करत आहे. या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी मलाबार समूहाने अमरावती आणि नागपूर येथे नवीन स्वयंपाकघर सुरू केले आहेत. याव्यतिरिक्त, जागतिक भूकमुक्त दिनाचा भाग म्हणून पश्चिम विभागातून ८,००० अन्न पाकिटांची नव्याने भर घालण्यात आली आहे.
सध्या हा कार्यक्रम आखाती देशांमधील काही केंद्रांव्यतिरिक्त भारतातील केंद्रशासित प्रदेशांसह १६ राज्यांमधील ३७ शहरांमध्ये राबविण्यात येत आहे. विस्ताराचा एक भाग म्हणून, या कार्यक्रमात आता १६ राज्यांमधील ७० शहरांचा समावेश केला जाईल. याशिवाय, जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणकामासाठी ओळखल्या जाणाऱ्या झांबिया या आफ्रिकन देशातील शाळकरी मुलांसाठी देखील हाच कार्यक्रम सुरू करण्याची समूहाची योजना आहे.
'आमच्या आजूबाजूला असे बरेच लोक आहेत जे दिवसातून किमान एक चौरस जेवण मिळविण्यासाठी धडपडत आहेत. आपल्या जगातून भूकेला दूर करण्यासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या सरकार आणि स्वयंसेवा संस्थांना मदतीचा एक छोटासा हात म्हणून आम्ही हा कार्यक्रम सुरू केला आहे,'असे या प्रसंगी एम. पी. अहमद म्हणाले.
'थानल - दया रिहॅबिलिटेशन ट्रस्ट' या सामाजिक कल्याणकारी उपक्रमातील प्रतिष्ठित स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने ‘भूकमुक्त जग’ (हंगर-फ्री वर्ल्ड) हा कार्यक्रम राबविला जातो. कुशल बल्लवाचार्यांद्वारे स्वच्छ वातावरणात पौष्टिक अन्न तयार करण्यासाठी विविध ठिकाणी आधुनिक स्वयंपाकघरे या उपक्रमांतंर्गत उभारण्यात आली आहेत. मलाबार समूह आणि थानलचे स्वयंसेवक पदपथांवरील बेघर आणि शहरी उपनगरातील गरजू लोकांना ओळखतात आणि अन्नाची पाकिटे त्यांच्या दारापर्यंत पोहोचवतात.
एनजीओचे हे स्वयंसेवक उपासमारीच्या सामाजिक आणि आर्थिक कारणांचे मूल्यांकन करण्यासाठी लाभार्थ्यांचे सर्वेक्षण देखील करत आहेत. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, मलाबार समूहाने थानलच्या सहकार्याने, गरीब आणि निराधार वृद्ध महिलांची ओळख पटवून घेऊन, त्यांना मोफत भोजन, निवास आणि इतर आरोग्य सेवा पुरवण्यासाठी ‘ग्रँडमा होम’ प्रकल्प या आधीच सुरू केला आहे. बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये अशी दोन 'ग्रँडमा होम' उभारण्यात आली आहेत. चेन्नई, कोलकाता, दिल्ली, मुंबई आणि केरळमधील काही निवडक शहरांमध्ये अशीच घरे येत्या काळात उभारण्याची योजना सुरू आहे. यामुळे उपेक्षित आणि निराधार महिलांना सन्मानाने जगण्याची संधी मिळणार आहे. मलाबार समूहाने रस्त्यावरील वंचित समाजघटकांतील मुलांच्या प्राथमिक शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी सूक्ष्म-शिक्षण कार्यक्रम देखील सुरू केला आहे.
याशिवाय, मलाबार समूह इतर सामाजिक कल्याण आणि सेवाभावी उपक्रमांमध्ये सक्रिय आहे जसे की वैद्यकीय सेवेसाठी आर्थिक सहाय्य, वंचित समाजघटकांतील गरजू मुली/ विद्यार्थीनींना शैक्षणिक समर्थन आणि घर बांधणीसाठी आंशिक समर्थन यांचा त्यात समावेश आहे. समूहाने मलाबार गोल्ड अँड डायमंड्ससह त्याच्या अन्य व्यावसायिक अंगांमधून मिळणाऱ्या नफ्यांपैकी पाच टक्के रक्कम सामाजिक कल्याण कार्यांसाठी अर्थात सीएसआर निधी म्हणून राखून ठेवला आहे. अशा समाजकल्याण कार्यक्रमांसाठी समूहाने आतापर्यंत २४६ कोटी रुपये खर्च देखील केले आहेत.