एक अग्निकुंड...

27 May 2024 17:14:44
Vinayak Damodar Savarkar powada
 
नरवीर श्रेष्ठ ते किती। झाले भारती।
तयांची न गणती। तयांची गणती।

खरोखर भारतवर्षात होऊन गेलेल्या नरवीरांची आणि रणरागिणींची गणती करणे अशक्यच आहे. परंतु, तरीही माझ्या मनात सखोल रुजलेले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी शौर्याचा आणि पराक्रमाचा तेजस्वी वारसा घेऊन जन्माला आलेले क्रांतिकारक म्हणजेच स्वा. विनायक दामोदर सावरकर आणि त्यांच्यावर रचलेल्या पोवाड्याची माहिती देण्यासाठी या लेखाचं प्रयोजन!

माझ्या चुलत सासूबाई माधवी नातू यांनी १९८२ साली स्वा. सावरकरांचे चरित्र वाचले. त्यामध्ये तात्यांनी चापेकर बंधूंवर पोवाडा रचला, या घटनेचा उल्लेख आला. तेव्हाच प्रखर देशभक्तीने प्रेरित झालेल्या भव्य, दिव्य आणि उदात्त अशा स्वातंत्र्यवीरांच्या जीवनचरित्रावर पोवाडा रचण्याची कल्पना त्यांना सुचली. त्यानंतर त्यांनी तात्यारावांच्या आयुष्याचा सखोल अभ्यास वाचनाद्वारे सुरू केला. ‘माझी जन्मठेप’, भा. द. खेर आणि शैलजा राजे यांची ‘यज्ञ’ कादंबरी, सावरकरांचे चित्रमय चरित्र याची मदत घेऊन अभ्यासाला सुरुवात केली. त्यांच्या माहेरी कल्याणला फडके चाळीतल्या घरी शाहीर गोपाळराव दामल्यांचे कायम येणे-जाणे असे, त्यामुळे लहानपणापासूनच खाडीलकर धाटणीच्या पोवाड्याच्या चाली त्यांच्या कानावर पडत होत्या. तसेच त्यांचे काका वि. वि. सहस्रबुद्धे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका’ या प्रसंगावर रचलेल्या पोवाड्याचा प्रभावही त्यांच्यावर होताच. माधवी नातू या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी असल्याने, रोज मुलुंड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि परत मुलुंड, असा प्रवास होत असे. या पोवाड्याचे वैशिष्ट्य असे की, हा संपूर्ण पोवाडा त्यांनी लोकल ट्रेनमध्ये गाडीच्या गतीच्या तालावर रचला किंवा त्यांना स्फुरत गेला, असे म्हणणे योग्य ठरेल.
 
तात्यांचा जन्म ते अंदमानात रवानगी या संपूर्ण घटनाक्रमाची रचना त्यांना वेगाने सुचत गेली. सावरकरांनी अंदमानात भोगलेल्या अपार हालअपेष्टांनी त्या व्यथित झाल्या व त्यामुळे पुढील रचना सुचण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी जावा लागला. माधवी नातू यांचे वडील कृष्णाजी सहस्रबुद्धे हे हिंदू महासभेचे कट्टर अनुयायी व त्या स्वत:ही बालपणापासून राष्ट्र सेविका समितीच्या सेविका असल्यामुळे, मावशी केळकर यांच्यावर त्यांची निष्ठा! त्यांच्याच शिकवणीनुसार पुढची रचना काही केल्या सुचत नसल्यामुळे, त्या शेवटी जगदंबेचे स्मरण करू लागल्या आणि त्यानंतर मात्र नाशिकला झालेल्या समितीच्या वासंतिक शिबिराहून परतताना गाडीतच पुढील रचना त्यांना सुचली. १९८३ साली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त पोवाडा गायनाचे कार्यक्रम उज्वला मंडळाच्यावतीने कल्याणच्या सेविका भगिनींनी सुरू केले. तारापूर, दादर, चिंचपोकळी, ठाणे, गिरगाव, कल्याण-डोंबिवली, मुलुंड, नाशिक अशा विविध ठिकाणी पोवाडा गायनाच्या कार्यक्रमातून गोळा केलेला रु. तीन हजार एवढा निधी स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर यांच्याकडे सुपुर्द केला.

पुढे १९८७-८८ साली कल्याणमधील शालेय विद्यार्थिनींचा एक संच तयार करून, शाळा व महाविद्यालयांमधून पोवाड्याचे कार्यक्रम सादर करून सुमारे ३५ हजार रुपयांचा निधी, बाबूजी म्हणजेच सुधीर फडके यांच्या सावरकरांवरील चित्रपटाला मदत म्हणून सुपुर्द केला. त्यानंतर एकदा गायनाची तालीम करत असताना शरद खोपकर यांनी ही रचना ऐकली व त्यांच्या मनात हा कार्यक्रम दृक्श्राव्य स्वरुपात सादर करण्याच्या कल्पनेने रुंजी घातली. शरद खोपकरांच्या संकल्पनेतून आणि दिग्दर्शनातून ‘एक अग्निकुंड’चा जन्म झाला. त्यानंतर ’हौशी महिला कलाकार मंच, मुलुंड’ असे नाव देऊन २००० ते २०१० पर्यंत या कार्यक्रमाचे भगूर, ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, पुणे, मुंबईतील सर्व उपनगर, नागपूर, चिपळूण, रत्नागिरी, अंदमान आणि मॅारिशस येथे एकूण ११७ प्रयोग झाले. त्यानंतर मात्र कलाकारांच्या वयामुळे ‘एक अग्निकुंड’चे प्रयोग थांबले. मधली अनेक वर्षं ‘एक अग्निकुंड’ थंडावले होते. २०२१-२२ पासून माझ्या मनात हा कार्यक्रम पुनरूज्जीवित करण्याचे विचार अधूनमधून घोळत होते. जानेवारी २०२३ पासून मात्र मी, अधिक गंभीरतेने या विषयाकडे बघू लागले. तसे मी घरात बोलूनही दाखवले. परंतु, म्हणतात ना प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ यावी लागते. त्याप्रमाणे २०२३च्या गुढीपाडव्याला माझ्या मनाने कार्यक्रम पुन्हा सुरू करायचे निश्चित केले आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी सुरू केली.

प्राथमिक चर्चा मी, माझ्या सासूबाई उर्मिला नातू आणि चुलत सासूबाई माधवी नातू यांच्यात झाली. त्यानंतर पूर्वीच्या पोवाड्यात काम केलेल्या प्रज्ञा गोखले, यांनीही अत्यानंदाने मार्गदर्शन करण्याचे मान्य केले. या तिघींचा भक्कम पाठिंबा मिळाल्यामुळे पुढच्या कामाला गती येऊन, समविचारी आणि सजग अशा १६ महिलांचा एक चमू तयार झाला. ‘एक अग्निकुंड’ पुन्हा प्रज्वलित करण्याची प्रक्रिया चालू झाली. एक मोठेच शिवधनुष्य पेलायचे होते, याची जाणीव सतत मनामध्ये होतीच. पहिला प्रयोग करण्यासाठी दि. २८ मे सारखा सुवर्णदिन दुसरा कुठला बरं असणार? असे सर्वानुमते ठरले आणि आम्ही सगळ्यांनी ध्येयाकडे वाटचालीस सुरुवात केली. दि. १ एप्रिल, २०२३ ते दि. २७ मे, २०२३ सतत तालीम, तालीम आणि तालीम. सगळ्याचजणी अतिशय समरसतेने आपापला सहभाग नोंदवत होत्या. या काळात प्रत्येकीने कुठलीही अपेक्षा न ठेवता, फक्त स्वा. सावरकरांवरील श्रद्धा आणि भक्ती हेच ध्येय ठेवून आपले तन, मन, धन तालमींसाठी खर्ची घातले. त्याचवेळी या चमूचं ‘स्वा. सावरकर विचार जागृती मंच, मुलुंड’ असे नामकरणही केले.
 
दि. २८ मे, २०२३ रोजी अपार कष्ट करून ‘एक अग्निकुंड’ आम्ही पुन्हा प्रज्वलित केले, याचे समाधान शब्दातीत आहे. आतापर्यंत आम्ही या कार्यक्रमाचे १२ प्रयोग करून, समाजाप्रती आपली जबाबदारी उचलण्यात यशस्वी ठरलो आहोत, हे सांगतानाचा आनंद अवर्णनीयच आहे. या संगीतमय दृक्श्राव्य प्रयोगात आपणास तात्यांच्या जन्माच्या वृत्तांतापासून, ते त्यांनी अष्टभुजा देवीसमोर घेतलेली शपथ, विदेशी वस्त्रांची होळी, येसू वहिनींना लिहिलेले सुप्रसिद्ध पत्र, कर्झन वायलीचा वध, जॅक्सनचा वध, तात्यांच्या प्रतिभेतून साकारलेले ‘सागरा प्राण तळमळला’ हे चिरंतन काव्य, त्रिखंडात गाजलेली मार्सेलिसची उडी, अंदमानची जन्मठेप, तत्पूर्वी असामान्य विचारांनी ओथंबलेला पत्नीला दिलेला निरोप, अंदमानातील भीषण हालअपेष्टा, कोलू ओढणे अशा तर्‍हेचे प्रसंग, अखेर अंदमानातून सुटका आणि स्वातंत्र्यप्राप्तीचे स्वप्न साकारण्याचा आनंद असे विविध प्रसंग, घटना आपणांस निश्चितच अनुभवायला मिळतील.
 
जगी क्रांतिवीर तुम्ही। तुम्हास प्रथम प्रणाम।
मानाचा मुजरा ‘मृत्युंजय’ तुम्ही म्हणून।
बंदुका करी घ्या लेखणीस तोडून
द्रष्टेपणी दिधला देशा मंत्र महान।
त्या ‘युगपुरुषा’ हे पुन: पुन्हा वंदन।
करू ‘युगपुरुषा’ त्या पुन: पुन्हा वंदन।
जी जी जी॥
 
 
अलौकिक आणि देदीप्यमान अशा राष्ट्रपुरुषाचे खडतर जीवनचरित्र, पोवाड्याच्या स्वरुपात सादर करून, त्यांच्या सकल गुणांचे स्तवन व स्मरण करून त्यापासून चेतना व स्फूर्ती घ्यावी, याच उद्देशाने केलेला हा प्रांजळ प्रयत्न!

 
सुचेता नातू
 
(आपल्यापैकी कोणालाही आपल्या संस्थेत, कार्यालयात, शाळेत, महाविद्यालयात किंवा इतरत्र हा कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास ९८२०७९६१८० किंवा ९८२११२४८९० या क्रमांकावर संपर्क करावा.)
 
 
 
Powered By Sangraha 9.0