चंदीगढ : "काँग्रेसचे सरकार आल्यास वाघा बॉर्डर उघडू" असे वादग्रस्त वक्तव्य पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि जालंधर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चरणजीत सिंह चन्नी यांनी केले आहे. शनिवार, दि. २५ मे २०२४ ला पत्रकार परिषदेत चन्नी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.
पत्रकार परिषदेत बोलताना चन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची रॅली फ्लॉप ठरल्याचा दावा केला. आठ जिल्ह्यांतून लोकांना बोलावण्यात आले, पण तरीही दोन ते अडीच हजार लोकच जमू शकले. पंजाबमध्ये भाजपची स्थिती काय आहे आणि लोक त्यांना किती मते देतील हे यावरून दिसून येते, असे वक्तव्य चन्नी यांनी केले.
पंतप्रधानांच्या रॅलीवर टीका करण्याबरोबरच चन्नी यांनी पत्रकारांशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले. ज्यामध्ये चन्नी यांनी घोषणा केली की, देशात आमचे सरकार आल्यानंतर आम्ही पंजाबची वाघा बॉर्डर खुली करू. जेणेकरून पाकिस्तानातील लोकांना उपचारासाठी पंजाबमध्ये यायचे असेल तर ते येऊ शकतील. यामुळे जालंधरमधील वैद्यकीय पर्यटनाला चालना मिळेल.