डोंगराळ भागातील नागरिकांनी सुरक्षितस्थळी जावे

24 May 2024 15:22:41

landslide bmc


मुंबई, दि.२४ : प्रतिनिधी 
मुंबईतील विक्रोळी आणि भांडूप भागातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासियांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पावसाळ्यात भूसख्खलन, दरड कोसळणे यांसारख्या दुर्घटना घडू नये यासाठी पावसाळापूर्वी नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे यासाठी महानगरपालिकेने आवाहन केले आहे.
विक्रोळी पश्चिम परिसरातील सूर्यानगर, पवई येथील इंदिरानगर, गौतम नगर, पासपोली, जयभीम नगर तसेच भांडूप पश्चिम येथील रमाबाई आंबेडकर नगर भाग १ व २, नरदास नगर, गांवदेवी टेकडी, गावदेवी मार्ग, टेंभीपाडा, रावते कंपाऊंड, खिंडीपाडा, रामनगर, हनुमान नगर, हनुमान टेकडी, अशोक टेकडी, आंब्याची भरणी, डकलाईन मार्ग, नवजीवन सोसायटी, तानाजी वाडी, दर्गा मार्ग, खदान विश्वशांती सोसायटी या ठिकाणच्या टेकडीच्या, डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासियांना प्रशासनाकडून इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्यादरम्यान जोरदार पावसाने दरडी कोसळण्याची, पावसामुळे डोंगरावरुन वाहत येणाऱया पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होऊन घरांची पडझड होण्याची शक्यता तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपड्या वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडू शकतात.
या भागातील धोकादायक इमारतींना, झोपड्यांना एस विभाग कार्यालयातर्फे सावधानतेच्या सूचना / नोटीस आधीच देण्यात आल्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून संबंधित भागातील स्थानिक रहिवाश्यांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्थलांतर न करता तेथेच राहणाऱ्या रहिवाश्यांची जबाबदारी त्यांची स्वत:ची असेल. नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास मुंबई महानगरपालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे ‘एस’ विभागाचे सहायक आयुक्त यांच्यावतीने कळविण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0