"मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा गजानन कीर्तिकरांचा पूर्वनियोजित कट!"

22 May 2024 18:41:59
 
Gajanan Kirtikar
 
मुंबई : मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा गजानन कीर्तिकरांचा पूर्वनियोजित कट होता, असा गंभीर आरोप भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कीर्तिकरांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखला. परंतू, कीर्तिकरांचा उद्देशच संशयित होता, असेही ते म्हणाले. ते बुधवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
प्रविण दरेकर म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवारी मिळवायची. अमोल कीर्तिकरसमोर गजानन कीर्तिकर उमेदवार राहतील. दुसरा कुणी उमेदवार नसेल आणि अर्ज मागे घेण्याच्यावेळी गजानन कीर्तिकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आणि आपल्या मुलाला बिनविरोध खासदार म्हणून निवडून आणायचे, असा गजानन कीर्तिकरांचा पूर्वनियोजित कट होता. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी कीर्तिकरांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखला. त्यादृष्टीने वागणूक दिली. परंतू, कीर्तिकरांचा उद्देशच संशयित होता, ते आता स्पष्टपणे बाहेर येत आहे.
 
हे वाचलंत का? -  पुणे अपघातावरून अमृता फडणवीस संतापल्या; म्हणाल्या, "बाल न्याय मंडळाचा निकाल..."
 
पुण्यातील कार अपघातावर बोलताना ते म्हणाले की, "अशा प्रकारच्या दुर्दैवी प्रसंगाचा राजकारणासाठी वापर करणे योग्य नाही. याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन कडक कारवाई केली जाईल आणि कुणालाही पाठीशी घालणार नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे. गृहमंत्री असूनही जनतेच्या हिताचा दृष्टिकोन समोर ठेवून कोर्टाच्या निर्णयावर टिप्पणी केली. ज्या ३०४ अ कलमासंदर्भात विरोधक टीका करताहेत ते ३०४ कलम असल्याचा दावाही गृहमंत्री फडणवीसांनी केला आहे. फडणवीस अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. ते स्वतः वकील असल्याने पोलिसांइतकेच त्यांनाही कायद्याचे ज्ञान आहे. राज्याचे ते मुख्यमंत्री राहिले आहेत. ते नवखे नाहीत. पोलीस त्यांना चुकीची माहिती देऊ शकत नाहीत. त्यांना कलमं माहित आहेत. ज्या पबमध्ये आरोपी गेला होता त्या पबवरही कारवाई झालेली आहे. त्यामुळे विरोधक या प्रसंगाचे फक्त राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहे," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "निवडणुका, मतदान हा लोकशाहीचा उत्सव मानत असू तर त्या उत्सवाकरिता आवश्यक अशी यंत्रणा सुसज्ज करणे हे निवडणूक यंत्रणेचे काम आहे. त्यात पूर्णपणे निवडणूक विभाग अपयशी ठरलेला आहे. या दुरावस्थेला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी भुमिका मी सत्ताधारी पक्षाचा असूनही घेतली आहे. मी प्रत्येक मतदान केंद्रावर फिरलो. कोंबड्याचा खुराडा असतो तशा प्रकारची व्यवस्था होती. घुसमटून लोकं मेली नाहीत हे आपले नशीब आहे. मतदान केंद्रे वातानुकुलीत असावी, वेटिंगच्या जागाही वातानुकुलीत असाव्यात. एका मतदान केंद्रावर कमीत कमी ५०० मतदार घ्यावेत जेणेकरून गर्दी होणार नाही. अशा प्रकारच्या नियोजनाची भविष्यात गरज आहे. येणाऱ्या अधिवेशनात या सर्व अव्यवस्थेचा पर्दाफाश मी करणार आहे," असे आश्वासनही त्यांनी दिले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0