आगीच्या घटना रोखण्यासाठी बीएमसी ऍक्शन मोडवर

21 May 2024 12:20:18

fire audit


मुंबई, दि.२१: प्रतिनिधी 
वारंवार पाहणी करून किंवा नोटीस देऊनही अग्निरोधक प्रणाली न लावणाऱ्या किंवा त्या अद्ययावत न ठेवणाऱ्या मालमत्ता धारकांवर आणि इमारतींवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच आगीसारख्या आपत्तींसाठी जबाबदार असलेल्यांवर पोलिसांकडून यथोचित कारवाई केली जाते. त्याच धर्तीवर महानगरपालिकेकडूनही जबाबदारी निश्चित केली जावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

मुंबई अग्निशमन दलाच्या भायखळा स्थित मुख्यालयात गगराणी यांनी सोमवार, दि.२० मे रोजी सकाळी प्रत्यक्ष भेट देऊन सुमारे तीन तास आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (वित्त)प्रशांत गायकवाड, प्रमुख अग्निशमन अधिकारी रविंद्र अंबुलगेकर, अग्निशमन दलाचे अन्य अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. आढावा बैठकीपूर्वी आयुक्तांनी अग्निशमन दलाची वाहने, विविध उपकरणे तसेच तंत्रज्ञानांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यामध्ये अग्निशमन यंत्र, फायर इंजिन, फोम टेंडर्स, फायर रोबोट, कंट्रोल पोस्ट व्हॅन, फायर बाईक आदींचा समावेश होता. दरम्यान, त्यांनी फायर इंजिनच्या शिडीच्या साहाय्याने जमिनीपासून सुमारे ९० मीटर उंच अंतरावर जाऊन पाहणी केली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दल हे १८८७ पासून कार्यरत आहे. मुंबई महानगरात एकूण ३५ अग्निशमन केंद्रे आहेत. त्यापैकी शहर विभागात १५, पूर्व उपनगरांत ७ आणि पश्चिम उपनगरांत १३ सुसज्ज अशी अग्निशमन केंद्रे आहेत. तसेच एकूण १९ लघू अग्निशमन केंद्र आहेत. त्यापैकी शहर विभागात ४, पूर्व उपनगरात ८ आणि पश्चिम उपनगरात ७ लघू अग्निशमन केंद्र आहेत. तसेच २२ विभागस्तरीय (वॉर्ड) अग्निशमन केंद्र आहेत. मुंबईकरांच्या सुरक्षितेच्या अनुषंगाने संकटसमयी जलद प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने मुंबई अग्निशमन दलाकडे एकूण ३०३ वाहने आहेत त्यात फायर इंजिन, फोम टेंडर्स, वॉटर बॉऊझर्स, एरियल लॅडर प्लॅटफॉर्म्स, हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म्स, टर्न टेबल लॅडर्स, बचाव वाहने, नियंत्रण कक्ष असलेले वाहन, फायर रोबोट, फायर बाईक, मोबाइल डिझेल डिस्पेन्सिंग व्हेईकल, एससीबीए वाहन आदींचा समावेश आहे. आग लागणे, इमारत पडणे, वाहन अपघात, झाडे पडणे, चक्रीवादळ, भूकंप, पूर, भूस्खलन, रासायनिक संकट, तेल-वायू गळती, अतिरेकी हल्ला आदी संकटसमयी नागरिकांच्या मदतीसाठी मुंबई अग्निशमन दल तत्पर असते.

कांदिवली (पूर्व) ठाकूर व्हिलेज येथे अग्निशमन केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले आहे आणि लवकरच त्याचे लोकार्पण होईल. अग्निशमन दलात कोणतेही वाहन किंवा तंत्रज्ञान समाविष्ट करताना ते किती अद्ययावत आहे, इतकेच पाहू नये. तर, संकटसमयी लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याची उपयुक्तता तपासावी. दुर्घटनांदरम्यान स्वयंसेवक, नागरिकांकडूनही बचावकार्यात मदत होत असते. अशा स्वयंसेवकांचा, नागरिकांचा यथोचित गौरव व्हायला हवा. जगभरात होत असलेले नवनवीन प्रयोग, अद्ययावत प्रणाली याविषयीची संशोधनात्मक माहिती गोळा करणारे स्वतंत्र अभ्यासक निर्माण करावे. आगामी काळात अग्निशमन कर्मचाऱ्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी, वजन आणि शरीराची ठेवण यांच्या सक्षमतेच्या आधारावर पदोन्नतीसाठी विचार करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प मार्गावर ठिकठिकाणी अग्निशमन केंद्रांची निर्मिती करण्यासाठी संबंधित यंत्रणांशी चर्चा करण्यात येईल, असेही गगराणी म्हणाले.

Powered By Sangraha 9.0