नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान आणि नरेश म्हस्के मताधिक्क्याने विजयी होतील!

20 May 2024 19:50:41
Ganesh Naik on Modi and Mhaske

नवी मुंबई :
लोकनेते आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक यांनी नवी मुंबईमध्ये सर्वप्रथम सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. लोकनेते आमदार नाईक यांनी कोपरखैरणे येथील तर जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी बेलापूर येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
 
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ठाणे लोकसभेसह महाराष्ट्रातील 13 जागांसाठी सोमवारी मतदान झाले. सकाळी ठीक सात वाजता नाईक कुटुंबीयांनी सर्वात प्रथम मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांना मतदानाचे आवाहन लोकनेते नाईक यांनी याप्रसंगी केले. जगामध्ये भारताचे प्राबल्य वाढण्यासाठी आणि भविष्यातही देशाची वाटचाल संपन्नतेकडे होण्यासाठी देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्याकडे राहिले पाहिजे, असे सांगून ठाणे लोकसभेतून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के मताधिक्याने जिंकून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी निवडणुका हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असल्याचे सांगितले. मतदान हा संविधानाने दिलेला हक्क असून राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. देशाच्या विकासासाठी आणि भविष्यातील प्रगतीची दिशा ठरवण्यासाठी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणे आवश्यक आहे. ठाणे लोकसभेतील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के विक्रमी मताधिक्याने विजयी होतील. लोकशाहीची समृद्ध परंपरा आणि देश विकासासाठी मतदान केल्याचे डॉ. संजीव नाईक यांनी सांगितले.

 
 

 
Powered By Sangraha 9.0