वोट जिहाद'ला `वोट यज्ञ'ने चोख उत्तर देणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भिवंडीत इशारा

    19-May-2024
Total Views |
devendra fadanvis
 
कल्याण : लोकसभा निवडणुकीत नागरिकांची मते मिळत नसल्याचे पाहून नकली शिवसेनेकडून मौलानांना पकडून व फतवे काढून `वोट जिहाद' ( Vote Jihad ) घडविले जात आहे. त्याला `वोट यज्ञ'ने उत्तर दिले जाईल. एक-एक देशभक्त `वोट' एकत्र करून समर्पणाच्या रुपाने यज्ञामध्ये `समिधा' म्हणून टाकेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. एका धर्माची मते मिळवून आपण जिंकू, असे ज्यांना वाटत असेल, त्यांना उत्तर द्यावेच लागेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
 
भिवंडी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंजुरफाटा येथे शनिवारी जाहीर सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी अनुसुचित क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष व श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित, भाजपाचे आमदार महेश चौघुले, निरंजन डावखरे, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, कर्नाटकचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुभाष माने, मनोज काटेकर, भाजपाचे भिवंडी पूर्व विधानसभा प्रमुख संतोष शेट्टी, मनसेचे मनोज गुळवी आदींसह महायुतीचे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरविण्यासाठी मतदान करा, असे कोणी सांगत असेल, त्यांना `जो मोदी का नही, वो हमारे काम का नही', असे उत्तर द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच महाभारतातील लढाईचा संदर्भ देत इंडी आघाडीत राहुल गांधी, उद्धव ठाकरे असे कौरव जमा झाले असून, या लढाईला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील पांडवांकडून शस्त्राने नव्हे तर `वोट' ने उत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले. यंदाची निवडणूक ही जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुन्हा निवडीची आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.‌
 
भिवंडी शहराचा २०१४ पासून महायुतीचे उमेदवार कपिल पाटील व भाजपाचे आमदार महेश चौघुले यांच्याकडून विकास केला जात आहे. एकेकाळी भिवंडी हा अप्रगत भाग म्हणून ओळखला जात होता. मात्र, येथील नागरिकांनी भाजपाला मत दिल्यामुळे भिवंडी शहराचा चेहरामोहरा बदलला, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.