चारधाम यात्रेदरम्यान मोबाईल फोनवर बंदी; पाहा नेमकं कारण काय?
17-May-2024
Total Views |
मुंबई (प्रतिनिधी) : उत्तराखंड सरकारच्या आदेशानुसार आता केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री धामच्या (Chardham Yatra) २०० मीटरच्या परिघात मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुख्य सचिव राधा रातुरी यांनी यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करत नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
देवभूमी उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रेसाठी दिवसेंदिवस लाखो भाविक पोहोचत आहेत. प्रशासनानेही सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. दरम्यान यात्रेकरूंच्या व्यवस्थेत अडथळा येत असल्याने उत्तराखंड सरकारने मोबाईल बंदीचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे. तसेच नोंदणी न करता आलेल्या भाविकांना परत माघारी पाठवले जाईल असे सांगण्यात आले आहे.
नोंदणीशिवाय दर्शन घेता येणार नाही
यात्रेकरूंसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवत आहोत की, कोणत्याही भाविकाने नोंदणी नसलेल्या वाहनाने किंवा नोंदणी नसलेल्या पद्धतीने येऊ नये. असे आढळल्यास त्यांना परत मागे पाठवले जाईल.