मुंबई : बोरीवली हेच आता माझं पहिलं घर आहे आणि उत्तर मुंबई ही माझी कर्मभूमी आहे, असं वक्तव्य उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायूतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी केले आहे. कांदिवली येथील नमो रथयात्रेच्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पीयूष गोयल म्हणाले की, "बोरीवली हेच आता माझं पहिलं घर असून माझ्या हातून काहीतरी चांगलं घडण्यासाठी मी इथे आलो आहे. उत्तर मुंबई ही माझी कर्मभूमी आहे. बोरीवलीने मला आणि माझ्या कुटुंबाला आणि आम्ही बोरीवलीकरांना आमच्या जीवनात सामावून घेतलं आहे. मुंबईकरांकडून होत असलेला प्रेमाचा वर्षाव हा मोदीजींसाठी आहे आणि तो थेट त्यांच्याकडे जात आहे."
पीयूष गोयल यांनी आपल्या प्रचारादरम्यान मत्स्यपालन समाज, फेरीवाला, विद्यार्थी, सनदी लेखापाल, वकील, व्यापारी, स्टॉक ब्रोकर, शिक्षक, ऑटोचालक, वाहतूकदार, मतदारसंघातील सर्व विधानसभा क्षेत्रांतील कुली, विविध प्रकारचे व्यवसायिक, निवासी सोसायट्यांचे रहिवासी, झोपडपट्ट्या आणि गावे, विविध संघटना, उद्योगसंस्था, विविध समुदाय आणि हजारो कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
"या मतदारसंघातील वेगवेगळ्या घटकांसाठी विशेष योजना आणि उपक्रम पाइपलाईनमध्ये आहेत. मतदारसंघाचे प्रतिनिधी आणि सरकारचे सदस्य या नात्याने उत्तर मुंबईचा विकास आणि वाढीच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात मी कोणतीही कसर सोडणार नाही," असेही पीयूष गोयल यावेळी म्हणाले.