विठ्ठलाचे अद्वैतरूप सांगणारे गदिमा बाबूजींचे सुप्रसिद्ध गीत

    15-May-2024   
Total Views |
 
 
vithhal kumbhar
 
स्वतःभोवती अखंड फिरत राहणारी ही पृथ्वी, ही सृजनदेवता सतत काही घडवत असते. त्यातूनच निर्माण होतात आकार, त्यांना प्राप्त होतं सगुणत्व आणि हा प्रवास शतकानुशतके चालूच राहतो. या विश्वाचा कर्ता करविता कोण? गदिमांचे एक गीत आहे,
 
फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार !
 
विश्वकर्मा म्हणजे विष्णू. ही सृष्टी निर्माण करणारा देव. देव म्हणजे सृजनाचे वरदान लाभलेला माणूसच. आपल्यातील देवत्वाची प्रचिती दिलीय माडगूळकरांनी या गीतात. कुंभाराचा दाखल देऊन. खरेतर हे गीत प्रपंच चित्रपटातले आहे. पण ते केवळ चित्रपटाशी संबंधित नाही. स्वतंत्र आहे. आपल्या निर्मितीला अशा वेगळ्या वळणापर्यंत पोहोचवण्याची ताकद असलेले हे दोघे. गदिमा आणि बाबूजी. आता पुढे गदिमा स्पष्टीकरण देतात,
 
माती पाणी उजेड वारा
तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार !
 
कुंभाराला मडके बनवण्यासाठी आधी माती मळून घ्यावी लागते. त्यासाठी त्यात योग्य मर्यादेत पाणी मिसळणे गरजेचे असते. त्यानंतर त्याला हवा तो आकार प्राप्त व्हावा यासाठी चाकाचा वेग महत्वाची भूमिका बजावतो. या वेगातून घर्षणाने निर्माण होणाऱ्या वायूच्या आवर्तनांना त्यांनी वारा म्हंटले आहे. आपल्या हातांनी मडक्याला आकार दिल्यानंतर त्यात पोकळीची निर्मिती होते. ते अवकाश. आकाश. आणि हे कच्च भांडं पक्के करण्यासाठी अग्निस्पर्श अपरिहार्य. त्यावर अग्निसंस्कार करावे लागतात. पृथ्वी, पावन, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांचा उपयोग कुंभार घट घडवताना करत असतो. ही पंचतत्वे ज्याच्या हातातले बाहुले बनतात अशा निर्मिकाची तुलना देवाशी केलीय त्यांनी! आता हा झाला केवळ निर्मितीचा प्रवास. पुढे जाऊन त्या निर्जीव विश्वात ते अर्थाची प्रतिष्ठापना करतात. पहा, ते म्हणतात,
 
घटाघटांचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा नकळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार !
 
प्रत्येक भांड्याचे या जगात येण्याचे कारण तो कुंभारच ठरवतो. त्या घाटांचे प्रारब्ध ठरवणार हाच त्यांचा देव. कोणत्या भांड्यात लोणी साठवायचे, कोणते भांडे अन्न शिजवण्यासाठी वापरायचे, हे सर्व ठरवणार तोच, त्याचा निर्माता.
 
राग तिलककामोद आणि राग देस हे दोन्ही रात्रीचे दुसऱ्या प्रहारीचे राग. म्हणजे साधारण रात्री ९ ते १२ ही वेळ. खनीज थाटलेही राग या गीतासाठी बाबूजींनी वापरले. संगीत आणि स्वर सुद्धा बाबूजींचेच. बाबूजींची गायकी स्वरप्रधान होती. रंगाच्या मनमुराद विस्तारासाठी शब्दांवर अन्याय करणं त्यांच्या तत्वात बसत नाही. त्यांचे उच्चर किती स्पष्ट असायचे. गीतकाराच्या शब्दांचा आदर केल्यानेच शब्द सूर हातात हात घालून प्रवास करतात हे त्यांना पक्के माहिती होतं. पुढे अतार्किकतेबद्दल बोलतात. नियतीचे फासे कसे असतात याबाबत आपण भवितव्य वर्तवू शकतो का? नाही ना? काय त्याच्या मनात तोच जाणे. शब्द आहेत,
 
तूच घडविसी तूच फोडिसी
कुरवाळिसि तू तूच ताडिसी
नकळे यातून काय जोडिसी?
देसी दे डोळे परि निर्मिसी तयांपुढे अंधार !
 
डोळ्यांचं साटंलोटं प्रकाशाशी असतं. प्रकाशाच्या अनुपस्थितीत दृष्टीला अर्थ उरात नाही. मग बुद्धीचे, प्रयत्नांचे हे डोळे देऊनही माणसाला चाचपडायलालावणाऱ्या या देवासारखा हा कुंभार सुद्धा घटांना डोळे देऊन त्याच्या आत घनदाट अंधार निर्माण करतो. अर्थात कुण्या वास्तूच्या साठवणुकीसाठी हा अंधारच जग तयार करत असतो. हा चराचरातला देव आणि मर्त्य माणूस यात फरक नाही. हे उदाहरण झाले केवळ कुंभाराचे. यातून काय सिद्ध होतं? हातातल्या कलेला, प्रतिभावंत माणसाला जेव्हा निर्मितीच्या प्रार्थना पाठ होतात, तेव्हा तो त्या विष्णुसमानच प्रतिविश्व निर्माण करणारा भगवंताचं रूप असतो.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.