जगावे तर शिवाजी महाराजांसारखे मरावे तर संभाजी राजांसारखे!
15 May 2024 14:09:46
(Tiger Raja in Nashik)
मुंबई (प्रतिनिधी) : "आपल्या मातृभूमिच्या रक्षणासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्यामुळे आपण हिंदू असल्याचे आज गर्वाने सांगू शकतोय. औरंगजेबाच्या अत्याचाराविरोधात छत्रपती शिवाजी महाराज लढले नसते, छत्रपती संभाजी महाराज समाजरक्षणाच्या उद्देशाने लढले नसते, तर आज आपण हिंदू म्हणून असतो का, हा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने संकल्प केला पाहिजे की, जगावे तर शिवाजी महाराजांसारखे मरावे तर संभाजी राजांसारखे.", असे प्रतिपादन तेलंगणा भाजपचे फायरब्रॅण्ड आमदार टायगर राजा सिंग ठाकुर यांनी केले.
छत्रपती संभाजी फाऊंडेशन नाशिक आणि सकल हिंदू समाज सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि.१४ मे महालक्ष्मी चौक, सिडको, नाशिक येथे धर्मसभा आयोजित करण्यात आली होती. लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, धर्मांतरण, वक्फ बोर्ड कायदा, गो-हत्या यांच्या निषेधार्थ तसेच मानखुर्दची पुनम क्षीरसागर आणि कर्नाटकची नेहा हिरेमठ या हिंदू तरुणींच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ ही सभा घेण्यात आली होती.
तरुणाईला आवाहन करत टी राजा म्हणाले, "आजच्या तरुणाईने देश, धर्म आणि समाजासाठी उभे राहण्याची, लव्ह-जिहाद विरोधात, धर्मांतर विरोधात उभे राहण्याची गरज आहे. संघटन प्रवृत्तीचा अभाव असल्यामुळे जिहाद्यांनी काश्मीरमधून लाखो हिंदूंना पळवून लावले. अशाप्रकारे संघटित न होता हिंदू केवळ घाबरून राहिले तर पश्चिम बंगाल-काश्मीरप्रमाणे इतर राज्यांतून ही हिंदूंना पळवून लावले जाईल."
उपस्थित महिलावर्गाला संबोधत पुढे ते म्हणाले, "आई जिजाऊंचा इतिहास आणि त्यांच्याबद्दल प्रत्येकीने वाचले पाहिजे. धर्मनिती, युद्धनिती या सर्वाचा अभ्यास जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना शिकवला होता. आपला मुलगा मोठा होऊन सर्वात आधी आपल्या धर्माचे रक्षण करेल, हा विचार त्यावेळी त्यांनी केला होता. परंतु आजची पिढी रिल्स बनवण्यात व्यस्त आहेत. कसे लढावे, संकट आल्यास युद्धनितीचा वापर कसा करावा, हे त्यांना ठाऊक नाही. प्रत्येक आईने आपल्या मुलीला काश्मीर फाईल्स चित्रपट एकदातरी दाखवायलाच हवा."
बाबरी मशिदीचे गुणगान गाणाऱ्या एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावरही यावेळी टी राजा यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, "ओवैसी जर बाबरी पुन्हा बांधण्याची भाषा करत असतील तर आम्हीसुद्धा येणाऱ्या पिढीला कारसेवेचे धडे देत राहू. ज्या-ज्या ठिकाणी हिंदूंची मंदिरे तोडून त्यावर आक्रमणे होतील, त्या-त्या ठिकाणी कारसेवा करण्यात येईल."