१९९८ साली ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान अभिनेता सलमान खान याने काळवीटाची शिकार केली होती. या प्रकरणात तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलम या कलाकारांना देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्याचं कारण म्हणजे १९९८ साली सलमानने केलेली काळवीट शिकार. या प्रकरणानंतर गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) आणि त्याची गँग सलमान खानच्या (Salman Khan) मागे हात धुवून लागली आहे. त्याने केलेया काळवीट शिकारप्रकरणी बिश्णोई गॅंगने सलमानला अजूनही माफ केले नाही. याचा परिणाम म्हणजे सलमानच्या मुंबईतील गॅलक्सी या राहत्या अपार्टमेंटवर झालेला गोळीबार. आज या प्रकरमातील सहाव्या आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, मिळालेल्या महत्वपुर्ण माहितीनुसार काळवीट हत्या प्रकरणी बिष्णोई समाज एका अटीवर सलमानला माफ करु शकतो असे अखिल भारतीय बिष्णोई महासभाचे अध्यक्ष देवेंद्र बूडिया यांनी सांगितले आहे.
देवेंद्र बूडिया म्हणाले की, " सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने सलमानसाठी या प्रकरणात जी माफी मागितली आहे त्याचा काही उपयोग नाही. असं तर याआधी राखी सावंतनेही माफी मागितली होती. काळवीट शिकार प्रकरणाच आरोपी स्वत: सलमान खान असून त्यानेच जर माफीनाम्याचा प्रस्ताव दिला तर त्याला मंदिरात यावं लागेल आणि जाहीर माफी मागावी लागेल. तरच समाज त्याला माफ करेल."
पुढे ते असं देखील म्हणाले की, "आमच्या २९ नियमांमध्ये एक नियम आहे क्षमादय हृदय. यात आमचे थोर महंत, साधु, नेतागण, बिष्णोई समाजाचे प्रमुख पंच आणि तरुण सगळेजणं मिळून विचारविनिमय करुन सलमानला माफ करु शकतात. मात्र त्याला आमच्या समाजाच्या मंदिरासमोर यावं लागेल आणि शपथ घ्यावी लागेल की असा गुन्हा तो पुन्हा कधीही करणार नाही. नेहमी पर्यावरणाचं आणि वन्यजीवांचं संरक्षण करेल. जर का या सर्व गोष्टी झाल्या तर असं झालं तर विचार करु शकतो." या सगळ्यावर अद्याप तरी सलमानने काहीच प्रतिक्रिया दिली नाही आहे.