"ते कदाचित डायलॉगबाजी करु शकतात पण..."; दरेकरांचा अमोल कोल्हेंना टोला

    12-May-2024
Total Views |

Pravin Darekar 
 
पुणे : ते कदाचित डायलॉगबाजी करु शकतात पण सर्वसामान्यांची कामं करु शकत नाही, असा टोला भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी शरदचंद्र पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांना लगावला आहे. चाकण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समर्थनार्थ सभा पार पडली. या सभेत भरपावसात व्यासपीठावरून भाजप गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी अमोल कोल्हे यांच्यावर तुफान फटकेबाजी केली.
 
प्रविण दरेकर म्हणाले की, "ही लढाई एक अभिनेता आणि एक नेता कार्यकर्ता अशी आहे. अभिनेता चांगल्या प्रकारे अभिनय करू शकतो. आता निवडणुकीतही त्याची नौटंकी, नाटकीपणा सुरू आहे. कदाचित आपण डायलॉगबाजी करू शकता पण सर्वसामान्यांची कामं करू शकत नाही. सर्वसामान्यांची कामं हा नेता, कार्यकर्ता करू शकतो, ते शिवाजीराव आढळराव पाटील आहेत," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "सुपारीबहाद्दर लोकांनी राजकारणावर बोलू नये!"
 
"काल त्यांची सभा झाली. त्या सभेत आढळराव पाटील, अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका झाली. त्यापलीकडे भाषण गेले नाही. विकासाच्या चार गोष्टी भाषणात आल्या नाहीत. आढळराव पाटील यांनी कुठल्यातरी देवस्थानाची १३ एकर जमीन लाटली असल्याची टीका केली. अरे अमोल कोल्हे दुसऱ्याच्या ताटात वाकून बघताना घोडगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या अशोक पवारांनी मल्लिकार्जुन देवस्थानाने ११३ एकर जागा दिली होती ती जागा हडप करण्याचे काम केलंय. जे देवाला फसवतात ते तुमची सेवा काय करणार? घोडगंगा कारखाना बंद आहे. स्वतःचा खासगी व्यंकटेश्वर कारखाना सुरु आहे. परंतु सर्वसामान्यांचा कारखाना सुरू नाही हे अमोल कोल्हेंचे कर्तृत्व आहे," असा घणाघातही त्यांनी केला.
 
ते पुढे म्हणाले की, "जाणता राजा साताऱ्यात पावसाची एक सर अंगावर आली तेथील खासदार निवडून आला. अजित पवार तर अखंड पावसात भिजताहेत मतांचा पाऊस त्यांच्यावर पडल्याशिवाय राहणार नाही. ही निवडणूक देशाच्या दृष्टीने महत्वाची आहे. कोण खासदार होणार, कुठल्या पक्षाचा होणार यापेक्षा या देशाने नेतृत्व कोण करणार ही ठरवणारी ही निवडणूक आहे. देशवासियांनी ठरवले आहे की १० वर्ष मोदी देशाला प्रगतीकडे नेऊ शकतात तर पुढील पाच वर्षही देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. ही देशाचा पंतप्रधान कोण असणार हे ठरविणारी निवडणूक आहे. गेली ५० वर्ष जे काँग्रेसवाले करू शकले नाहीत ते १० वर्षात पंतप्रधान मोदींनी प्रामाणिकपणे देशाच्या विकासासाठी काम केले, हे आपण नाकारू शकत नाही," असेही ते म्हणाले.