कुमार गंधर्वांचे जन्मशताब्दी वर्ष संपन्न

    08-Apr-2024
Total Views |

kumar gandharva 
 
आज ८ एप्रिल बरोब्बर १०० वर्षांपूर्वी शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ यांचा जन्म झाला. शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ म्हणजे आपले कुमार गंधर्व. हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील घराण्यांच्या पारंपरिक भिंती भेदून त्यांनी स्वतःची आगळ्या ढंगाची गायकी घडवली. ही संगीतकलेशी केलेलं प्रतारणा नव्हती तर सृजनाच्या आव्हानाला दिलेला न्याय होता. रसिकांनी तेवढ्याच मनोभावे त्यांचे संगीत स्वीकारले. त्यांचे वडील गायक होते. घरातच गायकी असल्याने तिचा प्रभाव पडून कुमार वयाच्या सहाव्या वर्षीच गाऊ लागले. त्यांचे गाणे ऐकून गुरूकल्ल मठाचे स्वामी यांनी त्यांना वयाच्या सातव्या वर्षी कुमार गंधर्व हे नाव ठेवले. हेच नाव पुढे रूढ झाले.
 
अलाहाबादच्या अखिल भारतीय संगीत परिषदेतील गायनाने एकदम प्रसिद्धी मिळून कुमार गंधर्व यांच्यावर बक्षिसे व पदके यांचा वर्षाव झाला. त्यांनी १९३६ पासून पुढे अकरा वर्षे मुंबई येथे बा. र. देवधर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. वडिलांनंतर देवधर हेच त्यांचे गुरु.
 
एका फुफुसाचा गायक
भानुमती कंस यांच्याशी लग्न झाले आणि काही काळाने त्यांना क्षयाने ग्रासले. या क्षयबाधेने त्यांचे एक फुफुस काढावे लागले. पुढे त्यांनी संगीत साधना मात्र थांबवली नाही. एका फुफुसाच्या आधारे त्यांनी अखेरपर्यंत संगीतसेवा केली. मोकळ्या स्वच्छ हवेसाठी त्यांनी मुंबई सोडली आणि ते मध्य प्रदेशातील देवास येथे राहू लागले. भानुमती कोमकली यांनी नवऱ्याची शुश्रूषा करून त्यांना बरे केले. पुढे त्यांना मुकुल शिवपुत्र नावाचा मुलगा झाला, पुढे चालून तो देखील गायक बनला. भानुमती वारल्या आणि कुमारांनी वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी लग्न केले. त्यांना जी मुलगी झाली ती म्हणजे आजची प्रख्यात गायिका कलापिनी कोमकली. तिचे नाव त्यांनी प्रख्यात पेटीवादक विठ्ठलराव सरदेशमुख यांनी सुचवल्याप्रमाणे 'कलापिनी' ठेवले होते.
 
कुमार गंधर्वांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार वगैरे सर्व घराण्यांचे सार काढून नवीनच गायकी निर्माण केली. माळवी लोकगीतांचा विशेष अभ्यास करून त्यांवर आधारित असे ‘गीत वर्षा’, ‘गीत हेमंत’, ‘गीत वसंत’ इ. कार्यक्रम सादर केले व संगीताला एक नवीनच क्षेत्र उपलब्ध करून दिले. अनुपरागविलास हा नव्या–जुन्या रागांत स्वतः बांधलेल्या बंदिशींचा संग्रह प्रसिद्ध केला. सूरदास, कबीर, मीराबाई यांच्या पदांच्या गायनाचे कार्यक्रम व खास माळवी लोकगीतांच्या मैफली यांसारखे नवनवीन यशस्वी प्रयोग त्यांनी सादर केले. त्यांचे प्रयोगशील मन सतत काहीतरी नवीन करण्याच्या उद्योगात असे.
 
वयाच्या साडुसष्टाव्या वर्षी १९९२ ला १२ जानेवारी रोजी त्यांचे निधन झाले आणि भारताने एक हरहुन्नरी कलाकार गमावला. आजही त्यांच्या नावाचे तेवढेच गारुड संगीत रसिकांचे मन ग्रासून आहे. या अभिजात गायकाचे जन्मशताब्दीनिमित्त मनोमन स्मरण..