नवी दिल्ली : संदेशखाली येथे माता-भगिनींवर झालेले अत्याचार सबंध देशाने पाहिले असून तृणमूल काँग्रेस हा कायदा व संविधान चिरडणारा पक्ष असल्याची जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपाईगुडी येथे जाहीर सभेत केली आहे. दरम्यान, जनतेला संबोधित करताना पंतप्रधानांनी सुरूवातीला जलपाईगुडीत झालेल्या प्रकरणात पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी तृणमूलसह काँग्रेस पक्षावरही जोरदार टीका केली आहे.
दरम्यान, बिहारमधील नवादा येथील रॅलीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील भाषणात ममता सरकारमध्ये झालेला संदेशखाली अत्याचार, केंद्रीय योजनांना लागलेला ब्रेक आणि केंद्रीय तपास यंत्रणांवरील हल्ले पाहता तृणमूलला धडा शिकविणे गरजेचे असल्याचे मोदींनी जनतेला म्हटले आहे.
पंतप्रधान म्हणाले, “देशातील प्रत्येक गरीबाचे सक्षमीकरण हे भाजप सरकारचे प्राधान्य आहे. मात्र येथील ममता सरकारने गरीब कल्याणाच्या योजनांना ब्रेक लावला आहे. ममता सरकारने चहाच्या बागा आणि चहा उद्योगाला स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी सोडले आहे. त्यामुळे या निवडणुकीत टीएमसीला धडा शिकवणे आवश्यक आहे. मी देशासाठी २४×७ काम करतो. २०४७ पर्यंत देशाला विकसित भारत बनवण्याचे आमचे स्वप्न असल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, टीएमसीला त्यांच्या बलाढ्य आणि भ्रष्ट नेत्यांना दहशतवादाचा खुला परवाना मिळावा अशी इच्छा आहे. त्यामुळे जेव्हा केंद्रीय तपास यंत्रणा येथे तपासाकरिता येतात तेव्हा तृणमूलकडून त्यांच्यावर हल्ले करण्यात आले. त्याचप्रमाणे, “संदेशखालीत काय झालं? हे संपूर्ण देशाला माहीत आहे. तिथल्या माता-भगिनींवर होणारे अत्याचार संपूर्ण देशाने पाहिले आहेत. परिस्थिती अशी आहे की प्रत्येक प्रकरणात न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतो.