नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. नाशिकच्या चांदवडजवळील राऊड घाटात एका एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ७ ते ८ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मंगळवार, ३० मे रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवडडवळील राऊड घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाला. बसचा टायर फुटून समोर येणाऱ्या ट्रकला धडकल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात जवळपास ६ ते ७ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले आहे. तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस जळगावहून वसईला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.