"उबाठाचे ८ आमदार संपर्कात! लवकरच शिंदेंशी भेट घडवून देणार"; बड्या नेत्याचा दावा

    03-Apr-2024
Total Views |
 
Uddhav Thackeray
 
नागपूर : उबाठा गटाचे ८ आमदार आमच्या संपर्कात असून लवकरच त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी भेट घडवून देणार असल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. उदय सामंत सध्या रामटेक दौऱ्यावर असून त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला.
 
उदय सामंत म्हणाले की, उबाठा गटाच्या उरलेल्या आमदारांपैकी ८ आमदार माझ्या संपर्कात आहे. मी त्यांची शिंदे साहेबांशी भेट घालून देणार आहे. पक्षप्रवेशाच्या वेळी त्यांची नावं समोर येतील." यावेळी शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हेदेखील उपस्थित होते.
 
रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, "काँग्रेसने रामटेकमधून एका महिला भगिनीला उमेदवारी दिली आहे. त्यांचा फॉर्म बाद होणार हे माहिती असताना त्यांनी उमेदवाराची बदनामी करण्यासाठी उमेदवारी दिली होती. या सगळ्याचं खापर ते विरोधकांवर फोडत आहेत. याशिवाय त्यांनी पर्यायी एबी फॉर्मदेखील नागपूरमध्ये तयार ठेवला होता. परंतू, काहीही झालं तरी महायूतीचेच उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होणार आहेत," असे ते म्हणाले.
 
तसेच येत्या १० तारखेला रामटेकमध्ये महायूतीची मोठी सभा होणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. शिवसेनेच्या वतीने सगळे अधिकार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आहे. त्यांनी घेतलेले निर्णय आम्हाला मान्य असतील, असेही ते म्हणाले.