शरद पवारांनी वर्ध्यातून काँग्रेस गायब केली; देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला

मोदींची जादू जगातल्या अर्थतज्ज्ञांनाही न कळणारी

    03-Apr-2024
Total Views |
 sharad pawar
 
मुंबई : "आम्ही काँग्रेसमुक्त वर्ध्या ( Congress Mukta Wardha ) हा नारा दिला होता. आम्हाला येथून 'पंजा' गायब करता आला नाही. परंतु, शरद पवारांनी वर्ध्यातून काँग्रेसचा पंजा गायब करुन दाखवला. आमचे स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केले", असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. ३ एप्रिल रोजी लगावला.
 
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्धा लोकसभेतून रामदास तडस आणि अकोल्यातून अनुप धोत्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तडस यांच्या प्रचारार्थ वर्धा येथे आयोजित 'भाजपा महारॅली'त ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, शरद पवार या ठिकाणी येऊन गेले, मी त्यांचेचे मनापासून आभार मानतो. कारण, जी गोष्ट आम्हाला जमली नाही, ती त्यांनी करून दाखवली. आम्ही काँग्रेसमुक्त वर्ध्याचा नारा दिला होता. आम्हाला पंजा येथून गायब करता आला नाही. पण शरद तो गायब करून दाखवला. आमचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. ज्या महात्मा गांधींचे नाव सांगून काँग्रेसने राजकारण केले. त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याचे काम शरद पवारांनी केले. त्यामुळे आपण सगळ्यांनीच त्यांचे आभार मानले पाहिजेत, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
 
काँग्रेस वर्ध्यातून हद्दपार, महाविकास आघाडीला येथे उमेदवार सापडेना. मग राष्ट्रवादीने एक उमेदवार काँग्रेसमधून आयात केला. त्यांना पक्के माहिती आहे, की विधानसभेत निकाल काही बरा लागणार नाही. लोकसभेचे तिकिट घेऊन आपण शहीद व्हावे, असे त्यांनी ठरवले असेल. पण काही हरकत नाही. सगळ्यांना शुभेच्छा आहेत, असेही फडणवीस म्हणाले.
 
वर्धा ना काँग्रेसचे ना पवारांचे
महात्मा गांधींचे वर्धा, ना काँग्रेसचे ना शरद पवारांचे. वर्धा भाजपाचे आहे, नरेंद्र मोदींचे आहे, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. रामदास तडस यांनी १० वर्षांत सर्वसामान्यांसाठी काम केले. सामान्य लोकांमध्ये ते फिरत राहिले. सातत्याने लोकांना ते उपलब्ध होते. त्यामुळेच जनतेचे विलक्षण प्रेम त्यांच्या पाठिशी आहे. रामदास तडस पैलवान आहेत. आमच्या पैलवानाने असा डाव टाकला की शरद पवारांच्या हातून कुस्तीगीर परिषद निघाली. त्यांना सगळे डावपेच माहीत आहेत. चेहरा भोळा असला तरी, वेळप्रसंगी ते धोबीपछाडही देतात. रामदास तडस ६० टक्के मतांनी निवडून येतील. आधी लाट होती, आता त्सुनामी आहे. अब की बार ४०० पार होणार आहे. मोदींनी गरीब कल्याणाचा अजेंडा या देशात राबवला. मोदींनी काय जादू केली, हे जगातल्या अर्थतज्ज्ञांनाही पडलेले कोडे आहे. २५ कोटी गरीब दारिद्र्य रेषेखालून बाहेर आहे. सगळ्या जगाला याचे कौतुक आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.