मुंबई (विशेष प्रतिनिधी): आसामच्या कामरूप जिल्ह्यातून रेस्क्यू करण्यात आलेल्या १५ गिधाडांना यशस्वीरित्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे. कामरुप जिल्ह्यातून या गिधाडांचे रेस्क्यू करण्यात आले होते. सोमवार दि. २९ एप्रिल रोजी ही पंधरा गिधाडे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली असून बॉम्बे नॅचर हिस्ट्री सोसायटी आणि आसाम वनविभागाचे हे यश आहे.
मार्च आणि एप्रिल २०२४ या काळामध्ये रेस्क्यू केले गेलेल्या या गिधाडांवर बीएनएचएस अर्थात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या आसाममधील बेळगुरी येथील गिधाड संरक्षण प्रजनन केंद्रामध्ये उपचार करण्यात आले. योग्य उपचारासहित त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली असून त्यांना सोमवार दि. २९ एप्रिल रोजी पुन्हा नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त करण्यात आले आहे.
हिमालयीन ग्रीफॉन ही गिधाडे स्थलांतर करणारी गिधाडे असून ती लवकरच आपल्या मायदेशी परतण्यासाठी ही निघतील. वेळेत उपचार आणि रेस्क्यू नंतर पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त केल्यामूळे आता ही गिधाडे आपल्या मुख्य अधिवासात पुन्हा स्थलांतर करू शकतील. गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्रातील हा अत्यंत मह्त्तवाचा टप्पा मानला जात आहे. ही गिधाडे पुन्हा नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त करताना आयएफएस डिंपी बोरा, वनपरिक्षेत्र अधिकारी दिपन डेका, शमीम अख्तर यासह इतर अधिकारी उपस्थीत होते.