उबाठा म्हणजे रंगबदलणारा सरडा : एकनाथ शिंदे

25 Apr 2024 16:08:28

Eknath Shinde (4)


छत्रपती संभाजीनगर :
उद्धव ठाकरे हे रंगबदलणारे सरडा आहेत, अशी खरपूस टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. निवडणूकीच्या रणधुमाळीत सध्या महायुतीच्या सभांचा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भूमरे यांच्या प्रचारार्थ त्यांनी भव्य सभा आयोजित केली होती, यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊतांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर त्यांनी निशाणा साधला.

एकनाथ शिंदे म्हणाले, "युतीत असताना उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान गात होते. आता मोदी यांच्या नावाने खडे फोडत असून इतक्या झटपट रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिला असेल."संदिपान भुमरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांती चौक ते गुलमंडी दरम्यान प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारोंच्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले.

"गेल्या निवडणुकीत गडबड झाली. पण या निवडणुकीत दोघांच्या भांडणात धनुष्यबाणाला लाभ होणार आणि महायुतीचा उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ही निवडणूक देशाच्या विकासाची प्रगती आणि नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याची आहे. बाळासाहेब ठाकरेंची घोषणा होती, गर्व से कहो हम हिंदू है. अबकी बार चारसो पारमध्ये संदीपान भुमरे पहिले हवेत. २०१४ नंतर दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट करण्याची हिंमत केली नाही. कारण मोदींनी दहशतवाद रोखला.", असे शिंदे म्हणाले.

"मोदींकडून ८० कोटी गरिबांना मोफत रेशन देण्यात येत आहे. त्यात फक्त हिंदू आहेत का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, आम्हाला मिंधे म्हणतात, नीच म्हणतात, खालच्या भाषेत टीका करतात हे तुम्हाला पसंत आहे का? सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे सहन होत नसल्याने शिवी देण्याचे प्रकार सुरु आहे. हा शेतकरी, कष्टकरी, माता भगिनींचा अपमान आहे. मी या आरोपाला कामाने उत्तर देतो. सूज्ञ मतदार मतपेटीतून उत्तर देऊन उबाठाला घरी बसवतील ही काळ्या दगड्यावरील भगवी रेघ आहे," असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

आयरे गैरे व्यक्तींचा इतिहास सर्वांना माहित असल्याने त्यांच्याबाबत न बोललेले बरे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. संदिपान भुमरे हाडाचा कार्यकर्ता असून त्यांना विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. संजय राऊत आणि चंद्रकांत खैरे, विनोद बनकर यांनी दलित बांधवांना मंचावरुन खाली उतरवले होते. हा वंचितांचा अपमान आहे. काँग्रेसने दलित आणि मुस्लिमांचा केवळ व्होटबॅंक म्हणून वापर केला, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. वंचित बांधवानी या अपमानाचा बदला घेऊन महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. आजच्या रॅलीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे ते म्हणाले.

Powered By Sangraha 9.0