मुंबई: महिंद्रा फायनान्सने कंपनीत १५० कोटींचा घोटाळा झाल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. कंपनीच्या वाहन कर्ज विभागातील एका शाखेत घोटाळा झालेला आहे. यामुळे कंपनीने आपल्या चौथ्या तिमाहीचे निकाल पुढे ढकलले आहेत. मंगळवारी कंपनीचे तिमाही निकाल अपेक्षित होते मात्र रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटल्याप्रमाणे ईशान्य पूर्व भागातील एका शाखेत हा घोटाळा उघडकीस आला आहे.
कंपनीच्या वाहन कर्जपुरवठा विभागात केवायसी बाबतीत हा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीने अंतर्गत चौकशी सुरू असल्याचे सांगत हा घोटाळा १५० कोटींहून अधिक असू शकतो असा अंदाज महिंद्रा अँड महिंद्रा फायनांशियल सर्विसेस वर्तवला आहे.
या प्रकरणी चौकशी यंत्रणा अधिक तपास करत आहेत याविषयी कारवाई सुरु असून काही जणांना अटकदेखील झाली असल्याचे वृत्तसंस्थेने सांगितले आहे. मंगळवारी कंपनीच्या समभागात ५.४७ टक्क्यांनी घसरण होत समभाग २६३.६० रुपयांवर पोहोचले होते. कंपनीने या गैरप्रकाराची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 'सेंट्रल फ्रॉड मॉनेटरिंग सेल' या विभागाला कळवला असून यासंबंधीची अधिक माहिती मिळू शकलेली नाही.