मतदारांचा आशीर्वाद मोदीजींपर्यंत पोहोचवा; पीयूष गोयल यांचे आवाहन

कांदिवली पूर्वेत मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन

    23-Apr-2024
Total Views |
abc
 
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्रंदिवस एक करून भारताला नव्या उंचीवर नेण्याचे काम केले आहे. आज पूर्ण देशाचा विश्वास त्यांच्याबरोबर आहे. ही निवडणूक देशाचे भविष्य ठरवणारी आहे. प्रत्येक मतदार नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक आहे. तो आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदरी ही महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांची आहे. येणाऱ्या काळात हा संकल्प करून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी मंगळवार, दि. २३ एप्रिल रोजी केले.
 
कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रातील महायुतीच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, कॅप्टन अभिजीत अडसूळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मन्सूर खान, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष (आठवले गट) संजय गायकवाड, शिवसेनेचे माजी नगरसेवक शंकर हुंडारे यांच्यासह महायुतीमधील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
मंत्री गोयल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या १० वर्षांत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत लाभ मिळवून देण्याचे काम झाले आहे. कोणताही भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे काम वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून झाले आहे. २०४७ पर्यंत विकसित, समृद्ध भारत बनवण्यासाठी आता आपले योगदान महत्वाचे आहे. येणाऱ्या पिढ्यांना सशक्त, मजबूत आणि विकसित देश देण्यासाठी येणाऱ्या काळात मेहनत करण्याचा संकल्प करुया, असे आवाहन त्यांनी केले.
 
मुंबईच्या विकासात गोयल यांचे योगदान - शेट्टी
खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मुंबई तसेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे मंत्री पीयूष गोयल हे आपल्याला उत्तर मुंबई लोकसभेचे उमेदवार म्हणून लाभले आहेत. मुंबईच्या विकासात त्यांचे योगदान मोठे आहे. येणाऱ्या काळातही प्रक्रियेमध्ये असलेली सर्व कामे ते पूर्ण करतील, असा विश्वास आहे. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने आपल्याला दिल्लीला पाठवायचे आहे.
 
बुथ पातळीवर मेहनत घ्या - भातखळकर
आमदार अतुल भातखळकर म्हणाले, उत्तर मुंबई लोकसभेचे उमेदवार पीयूष गोयल यांना महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य्याने आपल्याला निवडून द्यायचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी बूथ पातळीवर मेहनत घेण्याची गरज आहे. बूथ ही विजयाची जननी आहे. त्यामुळे आपापल्या भागातील जास्तीत जास्त मतदार मतदान कसे करतील, यावर कार्यकर्त्यांनी अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.