"संपूर्ण शिवसेना संपवूनच संजय राऊत पवारांकडे जाणार!"

    02-Apr-2024
Total Views |
 
Sanjay Raut & Sharad Pawar
 
मुंबई : संजय राऊत उद्धव ठाकरेंशी प्रामाणिक नाही तर शरद पवारांशी आहे. ते कधीतरी उद्धव ठाकरेंना फसवणार आहे, असे विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केले आहे. नारायण राणेंनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला.
 
नारायण राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी आपलं तोंड बंद करावं. या निवडणूकीत त्यांचे ५ ते १० आमदार राहतील. तसेच लोकसभा निवडणूकीनंतर संजय राऊतदेखील राहणार नाहीत. संजय राऊत शरद पवारांशी प्रामाणिक आहे. मी ज्या ज्या वेळी दिल्लीला पवार साहेबांच्या ऑफिसच्या बाजूला जायचो तेव्हा राऊत आतमध्ये बसले असायचे. ते पक्षाशी प्रामाणिक नसून उद्धवजींना कधीतरी फसवणार आहे. शिवसेना संपवण्याचं कारणही संजय राऊत आहेत."
 
हे वाचलंत का? -  लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी आणले पोतं भरून चिल्लर! कर्मचाऱ्यांची दमछाक
 
"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात २ दिवस मंत्रालयात गेले. अन्यथा मातोश्रीवर असायचे. पण आता मात्र रामलीला मैदानावर इंडी आघाडीच्या बैठकीला जातात. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत ५ खासदार आणि १६ आमदार आहेत. येणाऱ्या निवडणूकीपर्यंत १६ मधील ५ आमदार राहतील १० राहणार नाहीत. अशी व्यक्ती रामलीला मैदानावर जाऊन देशाच्या पंतप्रधानांवर बोलतात. त्यांचा राजकीय उंची काय, बौद्धिकता काय? भाजपचे ३०३ खासदार आहेत आणि तुमचे केवळ ५ आहेत," असे ते म्हणाले.
 
"भाजपला तडीपार करणार असे ते म्हणतात. उद्धव ठाकरे स्वत:ला काय समजतात माहिती नाही. त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे असं मला वाटतं. पंतप्रधानांवर बोलण्याची लायकी आणि गुणवत्ता नसताना भाजपला तडीपार करण्याची भाषा ते करतात. भाजप हा जगात सर्वात मोठा पक्ष आहे. याबद्दल जरा माहिती घ्या. नुसता सामना वाचू नका. बंडलबाज संपादकाने लिहिलेले लेख वाचू नका, बाकीचेही वाचा," असा सल्लाही त्यांनी दिला.