डाँकी, डाँकी याने गाढव, गाढव याने गर्दभ..

    14-Apr-2024
Total Views | 139
 Gadhav
 

सनातन संस्कृती ही प्रत्येक बाबतीत मानवी जीवनाशी निगडित राहिली आहे. हिंदू धर्मात प्राण्यांपासून वनस्पतींपर्यंत प्रत्येकाचे एक विशेष स्थान आहे. आपण अनेकदा गमतीने आपल्या प्रियजनांना गाढवाची उपमा दिली असेलच.. या गाढवाविषयी जाणून घेऊया या लेखातून....

मागील आठवड्यातील माऊलींच्या लेखात मुलांच्या बैठ्या खेळांचा अध्यात्म आणि खेळ हे दैनंदिन जीवनात कसे एकमेकांना पूरक ठरते ते आपण बघितले. एव्हाना आता मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या बहरल्या असतील आणि त्यात त्यांच्या बैठ्या खेळातील पत्त्यांचे डाव रंगात येत असतील. आम्हाला नकोत ते ऑनलाईन पत्ते, वर्षातील ५२ आठवडे दर्शवणारे ते पत्ते हाताने पिसणे आम्हाला आवडते. पत्ते खेळायला एकटा असो किंवा कितीपण भावंडे, सवंगडी मिळोत, ड्रॉवरमध्ये ठेवलेले ते ५२ पत्त्यांचे ’कॅट’ पालकांकडून मिळाले की प्रश्न मिटला. ‘मोठ्यांची बोलणी खायला लागणार नाहीत, अशा मैफिलीत गप्पांबरोबर मग आळीपाळीने पत्त्यांचे वेगवेगळे डाव खेळले जातात. खेळता खेळता अनेकदा ’अरे ए गद्ध्या’, ‘ए गाढव कुठला’ अशा प्रेमळ शब्दांनी अनेकजण गाढवाचा उल्लेख नक्कीच करत असतील. पत्त्यांच्या डावात ‘गाढव होणे’, ‘डाँकी’ हे शब्द आपण ऐकत आलो आहोत. आजच्या लेखात आपण खेळता-खेळता गाढवावर आधारित पत्त्यातला डाँकी, डाँकी याने गाढव, गाढव याने गर्दभ शितला देवीचे वाहन, या विषयावर काही विचार करणार आहोत.

वर उल्लेख केलेल्या ‘कॅट’ या शव्दावरून मला सी.ए.टी. ‘कॅट’ आणि डी. ओ. एन. के. ई. वाय. ‘डाँकी’ आठवतो. किशोरकुमारने सर्वांना गाढव कसे बनवले होते त्याची आठवण आशा भोसलेंनी एकदा एका मुलाखतीत सांगितली होती. किशोरकुमारला एका गाण्यात चक्क गाढव हवे होते. १९५८ मध्ये किशोरकुमार आणि नूतन यांचा एक हिंदी चित्रपट आला होता- दिल्ली का ठग. यामध्ये मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेले आणि रवी यांनी संगीत दिलेले एक हलकफुलक गाणं होते. गाण्याचे बोल प्राण्यांच्या अवतीभोवती रचले होते. ‘सी.ए.टी. कॅट’, ‘कॅट माने बिल्ली’, ‘आर्.ए.टी. रॅट, रॅट माने चूहा’ किंवा ‘जि.ओ.ए.टी. गोट’, ‘गोट माने बकरी एल.आय.ओ.एन्. लायन’, ‘लायन माने शेर... दिल है तेरे पंजे में तो क्या हुआ.’ आशा भोसलेंनी या गाण्याबद्दल तेव्हा एका मुलाखतीत सांगितले होते की, किशोरदांनी तेथे मागणी केली की, मला एक गाढव हवे आहे. गाणं जर जनावरांबद्दल आहे, तर गाढवामुळे त्या गाण्यात रंगत येईल, असे त्यांचं म्हणणे होते. दिग्दर्शक नारंग यांनी आपल्या सहकार्‍यांना लगेचच गाढव आणायला सांगितले. पण मला माहीत होते की, मुंबईत कुठं गाढव मिळणार? मी किशोरदांना म्हटले की, भूक लागलीये, आपण चहा-बिस्कीट खाऊया. आम्ही जेव्हा परत जात होतो तेव्हा किशोरदांनी मला म्हटले की, लोक मला वेडसर म्हणतात; पण आज मी सर्वांना गाढव बनवले, अशा गाढव या विषयावर बरेच लक्षात घेण्यासारखे आहे.

वेगवेगळ्या देवतांची वाहनं किंवा प्राणी अथवा पक्षीमुखी देवता याचे आपल्याला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. पृथ्वीच्या पाठीवर केवळ माणूस नव्हे, तर दृष्टीस पडणार्‍या आणि न पडणार्‍या सर्व जीवांना जगण्याचा समान अधिकार आहे हा मुद्दा त्यातून अधोरेखित केला गेलेला आहे. दुर्गासप्तशतीमध्ये म्हटले आहे- ‘ज्ञानुनो मनुजः सत्यं किंतू ते न ही’ केवलं म्हणजे मनुष्य हा ज्ञानी आहे. परंतु, तोच तेवढा ज्ञानी आहे असे नव्हे. पशुपक्षीदेखील ज्ञानवान असतात. हिंदू अथवा अन्य धर्मांत विविध देवतांची चर्चा आपल्याला आढळते, त्यातील मूर्तिशास्त्रात कित्येक प्राणी आणि पक्षी आढळतात, ज्यांचा विचार आपण सहसा ईश्वराच्या आयामांमध्ये फारसा करत नसतो.

शितला नावाच्या देवतेसह गाढव या चतुष्पाद पशुलाही मानाच स्थान दिल गेल आहे. गाढवाचे दोन प्रकार आपल्याला दिसतात. रानटी आणि पाळीव. शास्त्रीय भाषेत ज्याला ॠईक्वस हेमिओनस खरख्र असे संबोधले जाते ते फिकट पिंगट रंगाचं रानटी गाढव फार देखण दिसते. कच्छच्या छोट्या रणात तसेच लडाखमध्ये आपण रानटी गाढव पाहू शकतो. साधारण दोन हजार वर्षांपूर्वी उज्जैन येथे राजा विक्रमादित्याच्या काळात गाढवांचा बाजार भरत असे. अजूनही आपल्याला गाढवांचे बाजार बघायला मिळतात. पुण्याजवळील जेजुरीला पौष पौर्णिमेच्या सुमारास म्हणजे डिसेंबर जानेवारीच्या आसपास हा बाजार भरत असतो. पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीला पारंपरिक गाढवबाजारात अंदाजे हजार दोन हजार गाढवे विक्रीसाठी आणली जातात. त्यात लाखो रुपयांची उलाढाल होत असते. अहमदाबादजवळच्या वाऊथा येथे, महाराष्ट्रात रंगपंचमीच्या वेळी (पूर्वाश्रमीच्या अहमदनगर) येथील मढी धाराशीव अशा गावात पारंपरिक प्रथेनुसार बाजार भरत असतो.

 महाराष्ट्र, कर्नाटक येथून खरेदीदार तेथे गर्दी करतात, तर भावनगर वगैरे ठिकाणांवरून आलेले गाढवांचे व्यापारी उंचापुरा, तरतरीत काठेवाडी प्रकारची गाढवं आणतात. भगरी, खारी, पांढरा अशा विभिन्न रंगछटांची आकर्षक गाढवं जी विकायला आणलेली असतात, त्यांची साठच्यावर किलोचा बोजा वाहून नेण्याची क्षमता असते. घोडे नसणार्‍या देशांत किंवा ज्या देशातील लोकांना गरिबीमुळे घोड्यांचा वापर करणे परवडत नाही, अशा देशांत ओझी नेण्याकरिता व स्वारीकरिता गाढवांचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. आपण आपले एखादे दोनचाकी, चारचाकी वाहन खरेदी करताना जशा चाचण्या व पाहणी करत व्यवहार करतो तद्वतच तेथे व्यवहार चालू असतात. अनेक खरेदीदार त्या गाढवांना पळवत नेऊन त्यांची शारीरिक चाचणी घेतात त्यांना गूळ, तेल वगैरे खाऊ घालतात. पोळ्यासारखे त्या गाढवांना सजवतात. कुंभार, वैदू, कोल्ह्याटी, मदारी, गारुडी तसेच भटक्या विमुक्त समाजातील खरेदीदार त्या गाढव बाजारात येतात. मल्हारी मार्तंडाचं जे मूळ मंदिर कडेपठारावर आहे तेथे लागणार्या सामानाची ने-आण गाढवांकडून केली जाते. काटकपणा, चिकाटी, कष्टकरी वृत्ती, सहनशीलता आणि अवघड परिस्थितीत तग धरून राहण्याचा चिवटपणा असे सगळे गुण गाढवाच्या अंगी असतात.

गाढवाच्या ठायी जी चिवट, घट्ट वृत्ती आहे त्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अमेरिकेतल्या एका पार्टीचे चिन्हदेखील गाढव असल्याचे दिसते. ख्रिश्चनांचा भगवान येशू ख्रिस्त आणि गाढव व शिंगरु यांच्यावर आरुढ झालेल्या घटनेवर आधारित इस्रायल देशाची राजधानी असलेल्या जेरुसलेम येथील एक कथा त्यांच्या बायबलमध्ये प्रसिद्ध आहे. आपल्याकडे ११-१२ व्या शतकांच्या आसपासच्या अनेक शितला देवीच्या मूर्ती आढळतात. ‘शब्दकल्पधृम’ नावाच्या ग्रंथात तिचे रुप वर्णन करताना ती गाढवारुढ आहे, असे म्हटले आहे. शितलेला विविध प्रकारे वेगवेगळ्या प्रांतात पुजले जाते. ही देवी ज्वरासुराला म्हणजे विविध प्रकारचे ज्वर, गोवर आणि कांजण्या वगैरे तापाच्या रुपाने आलेल्या असुराला दूर करते. माणसाला शीतल करते, असे मानले जाते. प्रदेशानुसार तिच्या नावांमध्ये भेद आढळतो. चेतकमाता, मसानी अशी तिची विविध नाव आहेत. काही परंपरांमध्ये शितलेला पार्वतीचे एक रुप मानतात. तिला लोकदेवतेचही स्थान आहे.

शांत कष्टाळु स्वभावाच्या गाढवावर आरुढ झालेल्या शितलेला ठाकुरांनी दयामयी, मंगला, करुणामयी अशी नाव दिली आहेत. बंगाली साहित्यात मंगलकाव्य नावाच्या काव्यरचना १५व्या शतकापासून आढळतात. त्याच परंपरेत शितला मंगल काव्य नावाचं काव्य आढळते. माणसाचे रोग दूर करण्यासाठी शितलेनी गाढव हे आपलं वाहन म्हणून निवडले याचे कारण गाढव सात्विक गुणी असते म्हणून. गाढवाच्या पाठीवर जे सामान लादले जाते त्याबद्दल त्याला किंचितही लोभ नसतो. निर्लोभता, निष्कामता, त्याग आणि निस्वार्थता हे गुण माणसाने गाढवांकडून शिकावे म्हणून शितलेनं त्याला आपल्यासह मानाची जागा दिली. माणसाला सद्गुण शिकवू इच्छिणार्‍या देवीला तिच्या आदर्शांना गाढव आपल्यावरून वाहून नेते. आपल्या आसपास आढळणार्‍या शांतपणे काम करणार्‍या प्राणिमात्रांकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्याव, याचे मोठ प्रतीक शितला देवी आहे.संत एकनाथ महाराज यांच्या चरित्रात अशी घटना सांगितली आहे की, एकदा गंगेची कावड पाण्याने भरून घेऊन त्या पाण्याने देवाला अभिषेक घालायला जात असताना रस्त्यात तहानाने लोळण घेत असलेले गाढव त्यांनी पाहिले. आपल्या खांद्यावरून कष्टाने पायपीट करून आणलेली ती कावड गाढवाच्या मुखी ओतून ‘गंगेचे पाणी(गंगोदक) घालून हाच माझा देवाचा अभिषेक’ असे त्यांनी म्हटले होते.

संत एकनाथ महाराज यांची गोष्ट आपण कधीना कधी लहानपणी वाचली असेलच, भूतदया! हाच तो विषय आहे. संत तुकाराम यांनी म्हटल्यानुसार, ‘जे जे दिसे भूत तया मानूनी भगवंत’ या उक्तीनुसार मुक्या प्राणिमात्रांना खाऊ-पिऊ घालणार्‍यांच्या, आसरा देण्यासाठी स्वत:ला झोकून देणार्‍यांच्या अनेक कहाण्या अनेकांनी वाचलेल्या असतील. असे हे अनेकांना प्राणप्रिय असणारे गाढव चित्रपट, नाटकांमध्येही दिसते. ’गाढवाचं लग्न’ हे हरिभाऊ वडगावकर यांनी लिहिलेले मराठीतील प्रसिद्ध वगनाट्य प्रकाश इनामदार यांनी सादर केले होते, तर नंतर मकरंद अनासपुरे याचा ’गाढवाचं लग्न’ हा मराठी चित्रपटही २००७ मध्ये गाजला होता.

त्यांच्या शक्तिबाहेर जर गाढवावर काम लादले गेले, तर ती ते नीट करीत नाहीत किंवा काम न करता स्वस्थ ढिम्मपणे उभी राहतात. क्रूर वागणुकीचा ती प्रतिकार करतात. त्यांच्या अशा वागणुकीवरून ती निर्बुद्ध व हेकट असतात असा समज रूढ झालेला आहे. मात्र, मानवप्राणी त्याकडे दुर्लक्ष करून गाढवाचं अवमुल्यन करणारे शब्द पदोपदी वापरत असतोगाढव (नर) व घोडी यांच्यापासून उत्पन्न झालेल्या संकराला ‘खेचर’ म्हणतात आणि घोडा व गाढवी यांच्यापासून उत्पन्न झालेल्याला ‘हिनी’ म्हणतात. हिनी खेचरापेक्षा लहान व निकृष्ट प्रतीचा असतो. भारतीय सैन्यामध्ये सामान्यतः दोन प्रकारची खेचरे उपयोगात आणली जातात : सर्वसाधारण लष्करी कामे करणारी ओझ्याची हरकामी खेचरे आणि पहाडी तोफखान्याची कामे करणारी खेचरे, तर अशा गाढवांबद्दलची कहाणी वाचल्यावर आपलाही गाढवांकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदललेला असावा, अन्यथा शितला माता आपल्यावर कृपा करणार नाही बरका आणि मग राहाल तुम्ही डाँकी जन्मभर. नको ना तसे व्हायला! तर मग आपण ‘ज्ञानुनो मनुजः सत्यं किंतू ते न ही केवलं’ या भ्रमात राहून चालणार नाही.

 श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत )
९४२२०३१७०४
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121