काँग्रेसमध्ये खलबतं! वर्षा गायकवाड दिल्लीत दाखल

13 Apr 2024 18:32:08

Varsha Gaikwad 
 
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूका तोंडावर असताना महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून अजूनही मतभेद दिसत आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या जागावाटपासंदर्भात दिल्लीला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता मुंबईतील जागावाटपाचा तिढा दिल्लीपर्यंत गेल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
 
महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून वर्षा गायकवाड नाराज असल्याचे बोलले जात आहे. दोन दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या बैठकीत त्या अनुपस्थित होत्या. तसेच त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली नाराजी व्यक्तही केली होती. दरम्यान, आता ता दिल्लीकडे रवाना झाल्या आहेत.
 
 हे वाचलंत का? - "मला मुख्यमंत्रीपद हवं म्हणून...;" राज ठाकरेंचा टोला
 
दक्षिण मध्य मुंबई लोकसभेची जागा काँग्रेसला हवी होती. मात्र, जागावाटपात ती उबाठा गटाकडे गेली आहे. त्यामुळे वर्षा गायकवाड नाराज असून त्या काँग्रेस हायकमांडची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांच्यासोबत अमिन पटेल आणि अस्लम शेख हे देखील दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे आता दिल्लीमध्ये नेमकी काय चर्चा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
पत्रकार परिषदेत बोलताना "मुंबईचं अस्तित्व वेगळं आहे. पक्षसंघटनेत काम करत असताना कार्यकर्त्यांच्यासुद्धा काही अपेक्षा असतात. त्यामुळे पक्षाने महाराष्ट्राबद्दल कठोर भुमिका घ्यायला हवी होती. हे आम्ही पक्षश्रेष्ठींनाही सांगितलं होतं. काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही दक्षिण मध्य मुंबईत कार्यक्रम केलेत. उत्तर पश्चिम आणि उत्तर पूर्वमध्येही आमचं मोठं संघटन आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की, आम्हाला तिकीट मिळायला हवं. पण पक्षाने निर्णय घेतल्यानंतर काही गोष्टी स्विकाराव्या लागतात. आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करु," असे म्हणत वर्षा गायकवाडांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.
 
 
 
Powered By Sangraha 9.0