‘सेक्युलर हिंसाचारा’चा धर्म!

11 Apr 2024 21:30:12
A
 
बिगर भाजप राज्यांमध्ये दिवसेंदिवस हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांवर होणारे हल्ले किंवा त्यावरील निर्बंध यात वाढ होताना दिसते. बंगाल असो, तामिळनाडू अथवा केरळ, या राज्यांमध्ये हिंदूंवर होणारे धार्मिक अत्याचार हा समान दुवा आहे. काँग्रेसने तर ‘मुस्लीम लीग’च्या मागण्यांनाच आपल्या जाहीरनाम्यात स्थान दिले आहे. द्रमुकने उघडपणे सनातन धर्म नष्ट करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मतदारांनी मत देताना पक्षापेक्षा त्याची विचारसरणी लक्षात घेऊन, आपला निर्णय घ्यावा.
 
बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर भागात दोन दिवसांपूर्वी माँ रक्षा काली देवीच्या विसर्जनाच्या वेळी काही इस्लामी कट्टरवाद्यांनी हिंदूंच्या मिरवणुकीवर दगडफेक केली. या मिरवणुकीत भक्त रामाची भजने गात असताना, बाईकवर आलेल्या काही धर्मांधांनी मिरवणुकीवर दगडफेक सुरू केली. लगतच्या बिहारमधील अरारिया जिल्ह्यातही फुलकाहा येथे चैत्र नवरात्रीच्या दिवशीच भगवती देवीच्या देवळाची नासधूस करण्यात आली. या घटना अपवाद नसून, त्या आता या राज्यांतील सत्ताधारी पक्षांच्या हिंदूविरोधी धोरणाचा आविष्कार आहेत, हे मानण्यास जागा आहे.
 
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर ‘जय श्रीराम’ या घोषणेवरच बंदी घातली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मोटारींचा ताफा जात असताना, ही घोषणा दिली गेल्यावर ममताबानो आपली गाडी थांबवून त्यातून उतरल्या आणि त्यांनी ही घोषणा देणार्‍यांवर आगपाखड केली. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता. राम मंदिराच्या उद्घाटनावरही त्यांनी बहिष्कार घातला. दोन वर्षांपूर्वी दसर्‍याला दुर्गामातेच्या मूर्ती विसर्जनाच्या दिवसातही बदल करण्यात आला होता. कारण, त्या दिवशी मुस्लिमांच्या मोहरमच्या मिरवणुका निघणार होत्या. मुस्लिमांच्या मतांसाठी लाचार ममता बॅनर्जी यांनी आपला हिंदूविरोध जितका उघड करता येईल, तितका केला आहे. त्यांनी आता बंगालमध्ये हिंदूंवर जिझिया कर लादणे तेवढे बाकी ठेवलेले दिसते.
 
अशा घटना आता बंगालमध्ये फारच सामान्य. काही वर्षांपूर्वीपर्यंत काश्मीरच्या खोर्‍यात कोणत्याही शहरातील सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा दलांच्या चौकीवर बॉम्ब फेकून, दहशतवादी पसार होत असत. त्याचे कोणाला काही वाटत नसे. काश्मीर म्हटले की, असे घडणारच, असेच सर्वांनी गृहीत धरले होते. मात्र, २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यावर, काश्मीरमधील हिंसाचार उतरणीला लागला. कारण, दहशतवाद्यांविरोधात कठोर पावले उचलण्याचे स्वातंत्र्य सुरक्षा दलांना मिळाले होते. पुढे ‘कलम ३७०’ रद्द झाल्यापासून तर काश्मीरचा कायापालटच झाला. आता देशाच्या अन्य कोणत्याही सुरक्षित राज्यांप्रमाणेच काश्मीर खोर्‍यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ही जवळपास सामान्य होत चालली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काश्मीरमधील कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी फक्त पोलीस दलावर सोपविली जाईल आणि लष्कराला या कामातून मोकळे केले जाईल, अशी जाहीर घोषणाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. यावरून तेथील स्थिती किती सामान्य होत आहे, ते दिसून येईल. दहशतवादाचा बालेकिल्ला असलेल्या काश्मीरमध्ये इतके परिवर्तन घडू शकले असले, तरी प. बंगाल मात्र आता पूर्वीच्या काश्मीरच्या मार्गावर वाटचाल करीत आहे. त्या राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत केंद्राला लवकरच काही कठोर उपाय योजावे लागतील, असे दिसते.
 
बिहारचे मुख्यमंत्री असताना लालूप्रसाद यादव यांनीच भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या सोमनाथ ते अयोध्या यात्रेला अडविले होते आणि अडवाणी यांना अटक केली होती. लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या परिवाराने आपली हिंदूविरोधी भूमिका वारंवार प्रदर्शित केली आहे. लालूप्रसाद यांचा मुलगा व माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हा चैत्री नवरात्रात मासे खात असल्याचा व्हिडिओ सध्या फार प्रसिद्ध झाला आहे. ही सारी धडपड लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मते मिळावीत, यासाठी सुरू आहे.
आपला पक्ष हा ‘एमवाय’ या सूत्रावर मते मिळवितो, असे लालूप्रसाद उघडपणे सांगतात. ‘एमवाय’ म्हणजे ‘मुस्लीम आणि यादव समाज.’ मते मिळविण्यासाठी जे इतक्या उघडपणे धार्मिक आवाहन करतात, ते नेते आणि त्यांचे पक्ष हे सेक्युलर; पण हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर मते मागणारा भाजप मात्र जातीयवादी, असा हा तर्कदुष्ट युक्तिवाद. उत्तर प्रदेशात मुलायमसिंह यादव यांनी तर अयोध्येत जमलेल्या कारसेवकांवर गोळीबार करण्यास मागेपुढे पाहिले नव्हते. गोध्रामध्ये रेल्वेच्या डब्याला आग लावून, ५८ कारसेवकांना जाळून मारणारे आणि कारसेवकांवर गोळीबार करणारे यांची मानसिकता एकच आहे, असे म्हणावे लागेल.
 
आज स्वत:ला जनेऊधारी आणि दत्तात्रय गोत्राचे हिंदू म्हणविणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांनीच श्रीराम ही काल्पनिक व्यक्तिरेखा असल्याचे, प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले होते. इतकेच नव्हे, तर युपीएचे सरकार व्यापारी लाभासाठी रामसेतू तोडण्यास निघाले होते. हा सेतू प्रत्यक्ष प्रभू रामाने बांधला आहे, ही गोष्ट आता जगानेही मान्य केली आहे. सोनियासेनेने राम मंदिरावर बहिष्कार घातलेलाच आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काँग्रेसने ‘मुस्लीम लीग’च्या मागण्याच आपले धोरण म्हणून समाविष्ट केल्या आहेत.
 
मूळ काँग्रेसपासून अलग झालेल्यांनीही, काँग्रेसचा हा हिंदूद्वेषी डीएनए वारसा हक्काने घेतला आहे. तृणमूल काँग्रेस असो की राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांची हिंदूविरोधी भूमिका एकसारखीच आहे. एकंदरीतच काँग्रेस आणि तिचे समविचारी पक्ष हे अट्टल रामविरोधी असून, हिंदूद्वेषाने पछाडलेले आहेत, हे वारंवार सिद्ध झाले आहे. तामिळनाडूतील द्रमुकने तर काही महिन्यांपूर्वीच सनातन धर्माविरोधात गरळ ओकली होती. सनातन धर्माला नष्ट करणे, हे त्यांचे उघड ध्येय आहे. कम्युनिस्ट तर राजकीय सोयीनुसार आपले तत्त्वज्ञान बदलतात. त्यांच्या मते, धर्म ही अफूची गोळी असली, तरी त्यांना वावडे फक्त हिंदू धर्माचे आहे. इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्म हा बहुदा त्यांच्या लेखी धर्मच नसावा. केरळमधील वायनाडमध्ये हिंदूंना सार्वजनिकरित्या धार्मिक मिरवणुका काढण्यावर बंदी आहे. त्याचे कारण वायनाडमधील लोकसंख्येत मुस्लिमांची बहुसंख्या आहे.
 
काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतात हिंदूंच्या धार्मिक सणवारांच्या काळात मंदिरांच्या सुरक्षेत वाढ केली जात असे. पण, मुस्लीम किंवा ख्रिस्ती धर्मियांच्या धार्मिक सणांच्या काळात मशिदी किंवा चर्च यांच्याभोवती सुरक्षा ठेवावी लागत नव्हती. हे असे का करावे लागते? हिंदूंच्या मंदिरांना कोणापासून धोका आहे, असा प्रश्न कधी भारतातील कथित स्वतंत्र प्रसारमाध्यमांना विचारावासा वाटला नाही. उठसूठ राज्यघटनेचा हवाला देणार्‍या आणि सेक्युलॅरिझमचा जप करणार्‍यांनीच राजकीय लाचारीपोटी हिंदूद्वेष आणि एकतर्फी हिंसाचार जपला आहे. ‘सेक्युलॅरिझम’ म्हणतात, तो बहुदा हाच असावा! त्यामुळे बंगाल आणि बिहारमधील हिंदूविरोधी हिंसाचार हा हिंसाचार नसून, तो ‘सेक्युलॅरिझमचा धर्म’ आहे, असे म्हणावे लागते. म्हणूनच लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मत देताना, पक्षापेक्षा त्याच्या विचारसरणीचा विचार करून, आपला निर्णय घ्यावा.

 
 
Powered By Sangraha 9.0