मुंबई : राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरु असून लोकसभा निवडणूकांना आता काहीच दिवस शिल्लक आहेत. दरम्यान, काँग्रेसने मंगळवारी आपले दोन उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये धुळे आणि जालना या दोन लोकसभा मतदारसंघांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेसने धुळे लोकसभेसाठी शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली आहे. तसेच जालना लोकसभा मतदारसंघातून डॉ. कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपने दोन बड्या नेत्यांना तिकीट दिले आहे. भाजपने धुळे लोकसभा मतदारसंघात सुभाष भामरे तर जालन्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना उमेदवारी दिली आहे.
हे वाचलंत का? - वर्षा गायकवाड नाराज? पत्रकार परिषद घेत स्पष्ट केली भूमिका
जालना लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. याठिकाणी भाजपने रावसाहेब दानवे यांना सलग सहाव्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता धुळे आणि जालना या दोन्ही मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार असल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडीचे अंतिम जागावाटप जाहीर झाले असून यामध्ये उबाठा गट २१, काँग्रेस १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष १० जागांवर लढणार आहे. यापैकी उबाठा गटाने आपले सर्व उमेदवार जाहीर केले आहेत, तर काँग्रेसने आता आपल्या दोन उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे.