मुंबई : सांगलीमध्ये शिवसेनेचं काहीच नव्हतं. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी मिळून ती जागा घेतली, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगलीची जागा उबाठा गटाकडे गेल्याने काही काँग्रेस नेते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर आता प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "काँग्रेसला महाराष्ट्रात त्यांचं अस्तित्व ठेवायचं आहे की, नाही हे आधी त्यांनी ठरवावं. सांगलीमध्ये शिवसेनेचं काहीच नव्हतं. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी मिळून ती जागा घेतली," असे ते म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी काँग्रेसचे नाराज असलेले नेते विशाल पाटील यांनी आपली भेट घेतल्याची माहितीही दिली.
हे वाचलंत का? - सांगलीत काँग्रेसला दणका! विशाल पाटलांची मोठी खेळी!
ते म्हणाले की, "आज सकाळीच माझ्याकडे विशाल पाटील येऊन गेलेत. त्यांनी माझ्याशी चर्चा केली असून लवकरच ते काहीतरी निर्णय घेतील अशी अपेक्षा मी बाळगतो. मी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि फॉर्म भरल्यानंतर आपण ठरवू असं त्यांना म्हणालो," असेही त्यांनी सांगिलते. त्यामुळे आता विशाल पाटील वंचित बहुजन आघाडीकडून सांगली लोकसभा लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
उबाठा गटाने सांगली लोकसभेसाठी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, सांगली हा काँग्रेचा पारंपारिक मतदारसंघ असल्याचे सांगत विशाल पाटील इथून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. यासाठी विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेटही घेतली होती. परंतू, ही जागा उबाठा गटाकडे कायम राहिल्याने ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.