"ज्यांनी कधी खिशातून रुपया काढला नाही ते मणिपूरचा खर्च देणार!"

नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

    01-Apr-2024
Total Views |
 
Thackeray
 
मुंबई : ज्यांनी कधी स्वत:च्या खिशातून एक रुपया काढला नाही ते मणिपूरचा खर्च देणार आहेत, असा टोला भाजप आमदार नितेश राणेंनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला आता नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले.
 
नितेश राणे म्हणाले की, "काल उद्धव ठाकरेंनी दिल्लीत बसून एक फार मोठा जोक केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, ते स्वत: देवेंद्र फडणवीसांना मणिपूरला पाठवण्यासाठी पैसे देणार आहेत. ज्यांना उभ्या आयुष्यात कधी स्वत:च्या खिशातून एक रुपयाही काढण्याची सवय नाही ते आता आमच्या देवेंद्र फडणवीसांना मणिपूरला पाठवण्याचा खर्च उचलणार आहेत. उद्धवजी, मणिपूर फाईल्स काढण्याआधी दिशा सालियान फाईल्स हा चित्रपट काढा आणि मुख्य भूमिकेत तुमच्या मुलालाच घ्या. कारण दिशा सालियान फाईल्स या चित्रपटाचा सुत्रधार तुमचा मुलगाच आहे," असे ते म्हणाले.
 
 
यावेळी त्यांनी संजय राऊतांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, "संजय राऊत तुम्हाला कुठले चित्रपट काढायचे असतील तर तुम्ही गोरेगावचा रॉयल पाम फाईल्स किंवा न्यूझिलंड हाऊस फाईल्स या नावाचे चित्रपट काढा. तेव्हाच लोकांचं किती मनोरंजन होतंय हे कळेल."
 
"पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबई दौरा आहे. अपेक्षेप्रमाणे या दौऱ्यावर संजय राऊतांनी अकलेचे तारे तोडले. पंतप्रधानांचे हे दौरे आचारसंहितेचा भंग आहे असा जावई शोध त्यांनी लावला आहे. ज्यांनी साधी सरपंच पदाची निवडणूकही लढवली नाही, लोकांमध्ये कसं निवडून यायचं याचा ज्याला थांगपत्ताच नाही ते संजय राऊत निवडणूकीचे नियम आम्हाला सांगत आहेत," असा खोचक टोलाही नितेश राणेंनी राऊतांना लगावला आहे.
 
ते पुढे म्हणाले की, "संजय राऊत इलेक्टोरल बॉण्डची चर्चा करतात. पण इलेक्टोरल बॉण्डच्या रुपाने उबाठाला आलेल्या पैशांचीही चर्चा व्हायला हवी. त्या देणगीदार कंपन्या नेमक्या कोण आहेत, हे कळायला हवं. उद्धव ठाकरेंच्या काळात महापालिकेत महापौर असताना ज्यांनी ज्यांनी इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून पैसे दिले आहेत, त्यांना मुंबई महापालिकेचे किती कंत्राट मिळालेले आहेत? कोरोना काळात त्या कंपन्यांना किती टेंडर भेटले याची चौकशी आणि चर्चा झाली पाहिजे. नुसतं रोज सकाळी उठून भाजपच्या नावाने मंत्र म्हटल्यापेक्षा उबाठाला इलेक्टोरल बॉण्डच्या रुपाने किती पैसे मिळाले आणि ते कुणी दिले याचा हिशेब आम्हालाही जाणून घ्यायचा आहे. उबाठाने हा हिशोब मांडण्याची हिंमत करावी," असे आव्हानही त्यांनी दिले आहे.